नात्यातली सुंदरता


          आजच्या प्रगत दुनियेत नातेसंबंध जपायला किंवा त्या बद्दल विचार करायला कोणाकडे वेळच नाही. प्रत्येक जण आपापलं जीवन जगण्यात मग्न आहे. कारण परिस्थिती च तशी आहे. अडीअडचणीवर मात करत प्रत्येक जण या जगात आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. गरज नसलेला नात्यातला ताणतणाव, चिडचिड, सहनशीलता, अतिविचार या गोष्टींमुळे मानसिकरित्या आपण कमकुवत होत चाललो आहोत. त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो, नात्यात तणाव निर्माण होतो आणि पर्यायाने करियर वरच परिणाम होऊ लागतो आणि पुन्हा चिडचिड सुरु होते मग हे कालचक्र सुरुच रहात. या कालचक्रात अडकून कितीतरी लोकांच आयुष्य उध्वस्त झालेल आपण पाहतोय. त्यामुळे मला वाटत आज प्रत्येकाला गरज आहे ती "नात्यातली सुंदरता" जपण्याची. आपण आपली नाती सहज आणि सुंदर बनवली पाहिजेत जेणेकरून नात्यात ताणतणाव येणार नाही आणि परिणामी आपलं करियर सुद्धा प्रगतीपथावर जाईल.

          आपण म्हणतो यशस्वी व्यक्ती च्या पाठीशी एक अशी व्यक्ती असते ती साथ देते म्हणून यश मिळते पण मला वाटत एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायच असेल तो स्त्री असो वा पुरुष त्याच्या सर्व कुटुंबानेच दिलेली साथ ही खुप मोलाची असते. आज आपण पहातोय की स्पर्धा परीक्षेत खुप विद्यार्थी यश मिळवत आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच कुटुंब आहे म्हणून ही मूल यशस्वी होतात. त्या यशात या मुलाचाच सिंहाचा वाटा असतो हे जरी खर असल तरी त्याच कुटुंब मानसिकरित्या त्याला प्रबळ करून खुप मोलाची साथ देत असतं हेही तितकच खर आहे. माझे जवळचे मित्र डॉ विकास नाईकवाडे यांचे बंधू विशाल याची निवड तहसीलदारपदी झाली. त्याने खुप मोठ यश मिळवलं पण या यशात त्याच्या कुटुंबाने जी खंबीर साथ दिली तीच त्याला प्रेरणा देत गेली. मला वाटत त्यांच्या कुटुंबाने "नात्यातली सुंदरता" जपली म्हणून त्याला हे कष्ट करण्याची जिद्द येत गेली आणि तो यशस्वी झाला. असचं प्रत्येक नातं सहज आणि सुंदररित्या जर आपण जपलं तर नात्यातले ताणतणाव खुप प्रमाणात कमी होऊन ध्येय गाठायला मदत होईल.

          नातं आई वडिलांशी असो, भावाबहिणीशी असो, बायको मुलांशी असो वा जगातलं सगळ्यात सुंदर नातं म्हणजे ते मैत्रीच असो प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. ते अगदी सहजरित्या निभावता येऊ शकत पण काही लोक उगीच वाकडा मार्ग अवलंबून नात्याला किचकट बनवतात आणि आयुष्यभर स्वत:ला त्रास करून घेतात, दुसऱ्यालाही त्रास देतात. त्यापेक्षा सहज सोपा मार्ग अवलंबून सामजस्य दाखवून नाती खुप सुंदर बनवता येतात. खरं तर नाती ही मनाचं उत्तम टॉनिक आहेत ती मनाची ताकद वाढवतात. कठीण प्रसंगी एकमेकांना सांभाळण, जपन खुप महत्वाच आहे. त्यामुळे नाती टिकवण हे मानसिक स्वास्थ्यासाठी खुप आवश्यक आहे. नाती ही झाडासारखी असतात सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते पण एकदा ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही बिकट परिस्थितीत सावली देत राहतात. हीच नात्यातली सावली आणि नात्यातली ताकत माणसाला मानसिकरित्या प्रबळ बनवतात आणि कोणतही कठीन काम करायला प्रेरणा देतात.

          पैसा हेच जीवनाचं ध्येय बनत चाललय. ‘use and through’ ही प्रवृत्ती सर्वत्र वाढत चाललीय. कामपुरता नात्याचा वापर करायचा आणि नंतर विसरून जायच ही मानसिकता बोकाळलीय त्यामुळे जीवनातली ‘नाती’ आता ‘माती’ सम होऊ लागली आहेत. पूर्वापार चालत आलेले नातेसंबंध आता नकोसे वाटू लागलेत. पण माणसाला जर प्रगती करायची असेल तर नात्यागोत्यात प्रेम असलच पाहिजे. कोणत्याही नात्यामध्ये हवा प्रामाणिकपणा, विश्‍वास, प्रेम आणि दुसऱ्याला प्रामाणिकपणे समजून घेण्याची भावना. वेळप्रसंगी समोरच्या व्यक्तीला माफ करणही जमलं तर नात्यात अधिक सुंदरता येते. नात्यातली 'use and through' ची प्रवृत्ती बदलली पाहिजे. आयुष्यातलं प्रत्येक नातं हे मोत्याच्या हारासारखं असतं त्यातला प्रत्येक मोती महत्वाचा असतो तसच प्रत्येक नात्याच महत्व आहे. म्हणून सर्वच नाती ही मोत्याप्रमाणे जपली पाहिजेत.

          नवराबायको मधलं नातं तर अनेकदा सत्त्वपरीक्षा बघणारच असतं. विश्‍वासाच्या आणि समजुतीच्या पायावर हे नातं घट्ट तग धरून उभं असतं. एकमेकांना सोबत करताना, आधार देताना, सांभाळताना नकळत हे नातं चांगलच मुरतं, दृढ होत जातं. लोणचं मुरलं की त्याचा आस्वाद जेवणातली लज्जत वाढवतो. तसंच या नवराबायकोच्या नात्याचं आहे, ते मुरलं की आयुष्य जगायला खुप मजा येते. आपल्या मुलांसोबत खेळताना स्वत: पण लहान मूलासारखं वागताना, मनातला एक निरागस कप्पा उघडतो आणि मग सगळं कसं सहज सोपं वाटायला लागतं. मनातल्या चिंता, निराशा विसरून जायला लावणारं हे लोभसवाणं नातं असतं. या नात्यात निखळ आनंद मिळतो. घरातल्या वडीलधा-यांच्या गरजा ओळखून त्यांच्याशी केलेली मैत्री कर्तव्यपूर्तीचा आनंद देऊन जातेच, पण मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत, ही भावनाच अधिक काम करायला बळ देत रहाते.

          मैत्रीचं नातं तर हक्काचं असतं. जिथं आपण आपल्या मनाचे राजे असतो. तिथं जीवाला जीव देणं असतं... रुसन फुगन असतं... समजून घेणं असतं... गृहीत धरणं असतं... प्रसंगी हट्ट करणंही असतं. मैत्रीच हे नातं निभावताना सर्वच गोष्टीचा उत्तम ताळमेळ राखणं गरजेचं असतं. तो जमला तर मग तुमच्या आयुष्याचं गणित कधीच चूकत नाही. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करणारं हे निर्मळ नातं असतं ते जपलच पाहिजे. या सर्व नात्यांमध्ये स्वत:चं स्वत:सोबत असलेलं नातं सुद्धा दृढ असलं पाहिजे. हे नातं हे अतिशय आतलं, खोलवरचं नातं आहे. स्वत:वर विश्वास, प्रेम असेल तर तोच विश्वास आणि प्रेम इतर नात्यांतही सहजपणे दिसून येतो. स्वत:वरच नाराजी, अविश्वास असेल तर त्याची सावली इतर नात्यावरही पडते. आपल्या मनाला नवीन काही स्वीकारता येत नाही तेव्हाही इतर नात्यांवर ताण येतोच. त्यासाठी इतर नात्यांसारखंच स्वत:चं स्वत:शी असलेलं नातंही मोकळं, मैत्रीचं असायला पाहिजे तरच प्रत्येक "नात्यातली सुंदरता" जपता येईल.

तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- डॉ संदीप टोंगळे 

Comments

Popular Posts