"चष्मा"


           या सृष्टीची निर्मिती करताना खरं तर निसर्गाचं किंवा त्या सृष्टी निर्मात्याचं चुकलंच...... हो खरंच चुकलंय. जातीनुसार, धर्मानुसार वेगवेगळी माणसं तयार करायची विसरला तो...... जातीनिहाय शरीर रचना, धर्मनिहाय शरीर बांधा आणि जातीपातीवर आधारित सर्व शरीराची ठेवणं वेगवेगळी पाहिजे होती...... हा अमक्या जातीचा त्याचं नाक सरळ, तो तमक्या जातीचा त्याचे हात लांब, याला हाताला पंचवीस बोटे, त्याला तीनच...... म्हणजे सोपं झालं असतं. हो ना! मग आता तुम्ही म्हणालं की जाती,धर्म त्याने तयार केले नाहीत ते आपणच तयार केलेत...... हो खरंच आहे! "बनाने वाले ने फरक नहीं किया तो तू कोण होता है फरक करने वाला" हा क्रांतिवीर सिनेमा मधला dialouge हाच खरा माझ्या लेखाचा सार आहे. आपण आज जाती,धर्माच्या बंधनात एवढे अडकलोय की माणुसकीचा "चष्मा" घालायचं विसरून गेलोय. सर्वात आधी आपण माणूस आहोत आणि माणुसकी हिच आपली जात आणि धर्म. जातीच्या चष्म्यामुळे प्रगतीचा मार्ग धूसर दिसतोय, हे जातीचे चष्मे फेकून दिल्याशिवाय प्रगतीचा मार्ग आपल्याला दिसणार च नाही. पण कोणीच हा जातीचा चष्मा उतरवायला आज तयार नाही. उलट काळाच्या पलिकडचा विचार करुन समाजाच्या सुखासाठी झगडणार्‍या, समाजसेवेत संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या महापुरुषांची ही जातीनिहाय वाटणी होताना दिसतेय. ज्यांच्या कार्याने समाज उभा राहिला, त्यांच्याच नावाने समाज पेटवला जातोय. तुमचं नाव, प्रतिमा, मान अपमान महत्त्वाचे की जाती, धर्माची बंधनं जुगारणारे महापुरुषांचे विचार महत्त्वाचे?

          आपण लहान असताना यात्रा-जत्रांतले घोळक्‍यातले जादूचे खेळ पाहण्यासाठी वडिलांच्या खांद्यावर बसून पहावे लागायचे. त्यांच्या खांद्यावर बसून तो खेळ त्यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या तऱ्हेने पाहता येतो. लहान मुलांनी वडिलांच्या पायावर लोळण घेतली, तर जे वडिलांना दिसते, ते त्यांना दिसणार नाही. अर्थात, त्यांचे लहानपण हीच त्यांची मर्यादा होय. म्हणून वडिलांच्या खांद्यावर बसून म्हणजेच त्यांच्या विचारांवर स्वार होऊन त्यांनी अनुभवलेले, शिवाय त्यांच्यापेक्षाही पुढचे-लांबचे त्यांना अधिक स्पष्ट आणि चांगले दिसते. त्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. हे एक प्रतीक समजून आपण महापुरुषांकडे आपल्या सर्वांचे वडील म्हणून पाहू शकतो. महापुरुषांच्या खांद्यावर म्हणजे त्यांच्या विचारांवर स्वार होऊन, त्यांचे विचार आत्मसात करून, समजून घेऊन, अभ्यासून, त्यानंतर नवीन ज्ञानाच्या-काळाच्या, संदर्भाच्या आणि स्वतःच्या बुद्धीच्या प्रकाशात त्यांची मांडणी केली तर आपण काळाची गरज पूर्ण करू शकू आणि हे जातीचे चष्मे नक्कीच उतरवू शकू. त्यामुळे प्रगती चा धूसर मार्ग अगदी स्पष्ट दिसायला लागेल. या सर्व महापुरुषांच्या विचारसरणी प्रमाणे च आज या पृथ्वी तलावरील सर्वच लोक समान आहेत हे समाजाने मान्य केले पाहिजे. मी कोणत्याही विशिष्ट जाती, पंथाचा म्हणून मान सन्मान घेऊन मिरवू नये. जात ही उपमा त्याच्या व्यवसायावरुन भेटलेली आहे. (व्यवसाय हीच जात आणि जात हाच व्यवसाय. बस्स. इतकंच त्या जातीचं महत्व) पूर्वकाळात जात अशी काही कल्पना होती असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे मी या जातीपाती मानत सुद्धा नाही आणि तशा विचारात सामील ही होत नाही. प्रत्येकाने आपण कितपत सुज्ञ व्हायचे व कितपत अडाणी राहायचे तो ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण किमान जातीपातीच्या बंधनात अडकून एकमेकांचा द्वेष तरी करु नये.

          इतिहासातल्या कोणत्याही महापुरुषाने जाती, धर्म मानला नाही किंवा त्यानुसार प्रचार सुद्धा केला नाही. त्यांनी अगदी संपूर्ण आयुष्य झोकून जाती, धर्मातून समाजाला बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणून सोडले होते. पण आपण त्यांचीच जातीनिहाय वाटणी करून त्याचं प्रगल्भ समाजकार्य जातीपुरतं मर्यादित ठेवून त्यांना लहान करतोय असं नाही का वाटत? खरंतर आपल्या या कृतींमुळे ते लहान होणारच नाहीत पण त्यांनी जे त्यांच्या विचारांचं बीज रोवलं होत त्याचं लहानसं रोपटं निर्माण झालं खरं पण अजूनही त्या वटवृक्षाच्या सावलीची वाट पाहतेय आमची तरुण पिढी...... जाती, धर्माच्या चष्म्यातून पाहिलं तर मला त्या थोर महापुरुषांचे विचार अडगळीत पडल्यासारखे वाटतात. ज्या विचारांची खरी आज गरज आहे, जे विचार आजचा तरुण घडवू शकतात ते विचार आपण जाती, धर्मात बांधून ठेवणं किती योग्य आहे? थोड्या फार फरकाने सर्व महापुरुषांच्या बाबतीत हीच अवस्था आहे. फक्त वादाचे मुद्दे बदलतात, वाद चालूच राहतो आणि विचार मागेच पडले (किंवा पाडले?) जातात. थोर महापुरुषांनी केलं ते दिव्यच होतं आणि दिव्यच राहील पण त्यांना दैवत्व देऊन त्यांचे अनुकरण न करण्याची काढलेली पळवाट योग्य आहे का? खरे तर, महापुरुष माणसेच असतात आणि आपणही माणसेच आहोत(हो ना?). हे ओळखले, की महापुरुषांनी दिलेले विचार आणि केलेले कार्य पुढे घेऊन जाणे, प्रसंगी त्यात भर टाकणे हे माणूस या नात्याने समाजाप्रती आपले कर्तव्यच आहे. महापुरुषांनी माणुसकीचा "चष्मा" घालून जाती पातीची बंधन जुगारली आणि प्रगल्भ विचार मांडले, आज आपणही घालूयात का हाच "चष्मा"?

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे

Comments

Popular Posts