“आयुष्य १०० दिवसाचं”



          अगदी तिशीतला, सांसारिक भावविश्वात गुंतलेला, आर्थिक अडचणीमुळे सतत चिंतेत राहणारा हा तरुण, आज मात्र “तो” खूपच खुश होता. त्याने केलेल्या अविरत कष्टाचं फळ त्याला पदोन्नती आणि पगारवाढ या स्वरुपात मिळालं होतं. आपण आयुष्याची सगळी गणितं अगदी अचूक सोडवली या विचारात तो घरी निघाला. जाताना बायकोसाठी नवीन घडयाळ, आई साठी साडी, मुलांसाठी खाऊ असं बरच काही घेऊन गाडीला किक मारून तो निघाला. जग जिंकल्याचा आनंद आणि घरी लवकर पोहोचून आनंदाची बातमी सांगण्याची ओढ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याच्या कष्टाचं आज चीज झाल होतं, हा आनंद त्याच्या नसानसात भिनला होता. घरी लवकर पोहोचुन हा आनंद घरच्यांसोबत साजरा करू अस मनातल्या मनात ठरवून गाडीचा स्पीड त्याने आणखीच वाढवला...... पण समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्न, जिद्द, भावना, आनंद सगळं सगळं संपवलं. बायकोला घेतलेले नवीन घडयाळ रस्त्यावर पडून फुटून बंदच पडलं, आईची साडी त्याच्याच रक्ताने माखली गेली, मुलांसाठी घेतलेल्या खाऊचा चिखल झाला, लाल चिखल..... सगळा आनंद, सगळी स्वप्न सगळ्या वस्तू अशा क्षणार्धात विखुरल्या गेल्या, चेंदामेंदा झाल्या. नियतीच्या या आघाताने त्याच आयुष्यच संपवलं होतं. असा कितीसं आयुष्य जगला होता तो. निवृत्ती नंतरच्या सुंदर आयुष्याची स्वप्न पाहणारा हा तरुण आज या जगात नव्हता. खरच हे आपलं आयुष्य किती अनिश्चित झालय ना......!

          रोजच्या तणावपूर्ण, चिंताग्रस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयात हृदयविकाराचे झटके, अकस्मात होणारे वाहनांचे अपघात आणि खूप कमी वयात गंभीर आजार उद्भवत आहेत. अशा अकस्मात घडणाऱ्या घटनांमुळे माणसाचं सरासरी आयुष्यमानच कमी होत चाललंय. पण मला वाटत आपण जर तणावमुक्त आयुष्य जगलो तर आपण यातल्या बऱ्याचश्या गोष्टी टाळू शकतो. गोलमाल या हिंदी चित्रपटात एक गाण आहे “अपना हर दिन ऐसे जिओ, जैसे कि आखरी हो, जिओ तो इस पल ऐसे जिओ, जैसे कि आखरी हो”. आपला हा दिवस, हा क्षण शेवटचाच आहे असं गृहीत धरून जर आपण येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगला तर हे जग किती सुंदर दिसू लागेल ना......! पण खरतर माणसांच्या स्वभावातील वेगवेगळ्या पैलूमुळे, समोर येणाऱ्या निरनिराळ्या क्षणांमुळे प्रत्येक दिवस असा तणावमुक्त जगणं शक्य नसतं. काही कारणामुळे कधीकधी काही गोष्टीसाठी मानसिक तणाव येतोच त्यामुळे प्रत्येक दिवस तणावमुक्त जगणे हे तसं पाहिलं तर प्रत्यक्षात कठीणच आहे. झी मराठी वर सध्या एक मालिका सुरु आहे “१०० डेज” नावाची. त्यात अजय ठाकूर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका इतकी सकारात्मक आणि सुंदर रेखाटली आहे कि माणसाच आदर्श जीवन कसं असावं हे त्यातून नक्कीच कळतं. आदर्श मुलगा, आदर्श अधिकारी, आदर्श सहकारी, आदर्श प्रियकर, आदर्श मित्र, आदर्श शेजारी आणि एक आदर्श नागरिक म्हणून त्याचं जे जीवन तो जगतो ते खूप प्रशंसनीय वाटतं. पण शेवटी ते काल्पनिक पात्रच आहे. मालिकेच नाव “१०० डेज” आहे पण खरचं आपण आपलं आयुष्य १०० दिवसच उरलंय अस समजून जर एक आदर्श जीवन जगू लागलो तर कितीतरी समस्यांची उत्तर सहज मिळतील ना......! आणि त्यातून आयुष्यातला अतिरिक्त ताणतणाव नक्कीच कमी होऊ शकेल. म्हणून मला वाटत आयुष्य १०० वर्षाचं न समजता आपलं “आयुष्य १०० दिवसाचं”च आहे असं समजून जर आपण वागलो तर आयुष्य आणखी सुंदर वाटेल.

          आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्ये कडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जर पाहिलं आणि त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला तर हे तणावयुक्त आयुष्य सहज सुंदर होऊन जाईल. मी माझ्या मनातलं लिखाण ब्लॉग, फेसबुक, whatsapp वर पोस्ट करायला सुरु केल्यापासून बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि काही खूप वाईट ही प्रतिक्रिया आल्या. डॉक्टरकी करायची सोडून कशाला असल लिहित बसतोय हा? सगळ्याला का पाठवत बसतो? काय उपयोग या लिखाणाचा? यातून काय फायदा होणार आहे का? तुझ्या उक्तीत आणि कृतीत साम्य आहे का? मित्रांनो, खरंतर नकारात्मक गोष्टींचा विचार करू नये पण केलेल्या वाईट टीकेबद्दल सकारात्मक पाहण्याची मला सवय लागलीय. पहिली सकारात्मक गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणाला चांगली असो वाईट प्रतिक्रिया तर मिळाली ना... दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे कोणीतरी माझ्या लिखाणाचा किमान विचार तरी करतय ना... आणि मी हे लिखाण डॉक्टरकी सोडून अजिबात करत नाही तर मी डॉक्टर आहे म्हणून करतोय. कारण डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णाच्या शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्य ही चांगलं रहाव या साठी प्रयत्न करणं यात वावग काय आहे......? त्यासाठी माझ्या मनात येणारे चांगले विचार शब्दरूपात मांडून मी एक प्रकारे डॉक्टरकीतला उपचार च करतोय ना... आणि डॉक्टर या नात्याने ते माझं कर्तव्यच आहे, कोणाला आवडो न आवडो. शक्यतो कडू औषध रुग्णाला आवडतच नसत. हो ना......? मी माझं लिखाण करताना जे चांगल सुचेल ते लिहितो पण मी अगदी तसंच वागतो असं मी म्हणत नाही. पण अशा लिखाणामुळे एखाद्या चांगल्या विचाराशी आपण बांधले जातो हे नक्की. आणि त्यामुळे एखाद्यावेळी नकळत कृतीत चूक झाली तर ती स्वतः समजून घेण्याचा समजूतदारपणा आणि आपली चूक लक्षात घेऊन माफी मागण्याचा चांगुलपणाही याच लिखाणामुळे निर्माण होतोय हे ही तितकच खरं आहे असं मला वाटतं. हे सर्व सांगण्यामागच कारण एकच कि मी या सर्व टिके नंतर खूप निराश आणि नकारात्मक झालो होतो. पण माझा मित्र अजित थोरबोले याच्याशी बोलल्यानंतर आयुष्याबद्दलची खरी सकारात्मकता कळली. मी माझं आयुष्य १०० दिवसच उरलय असं समजून या नकारात्मक टीकांचा अशाप्रकारे सकारात्मक विचार करू लागलो म्हणून माझा मनावरचा ताण कमी झाला. आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे असच सकारात्मक पाहिलं तर नक्कीच या सुंदर आयुष्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.

          आपलं ही आयुष्य त्या तरुणासारखच अनिश्चित आहे. पण जेवढही आयुष्य आपल्याला मिळणार आहे ते अगदी आनंदात, उत्साहात घालवता आलं पाहिजे. एक खूणगाठच बांधून ठेवली पाहिजे कि एक न एक दिवस सगळे सोडून जाणारच आहेत, कोणीही आपल्या सोबत आयुष्याच्या सोबतीला आलं नाही आणि कधी येणारही नाही. क्षणीक नाराजी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात कसा जाईल असाच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्वांचा प्रवास वेगवेगळ्या वाटेवर सुरु असतो त्यामुळे आपण कोणाला थांबवू शकत नाही. आपण फक्त एवढं करू शकतो कि एक असा वृक्ष बनू शकतो कि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक वाटसरू ज्या वृक्षाखाली काही क्षण विश्रांती घेऊन, मरगळ झटकून पुढच्या प्रवासाला निघू शकेल. दुसऱ्या व्यक्ती कडून चांगलं वागण्याची अपेक्षा आपण ठेवत असू तर आधी आपणही तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अपेक्षा ठेवत असेल तर अपेक्षा भंग झाल्यावर तो सोसायची तयारी ही ठेवली पाहिजे. त्यामुळे अचानक अपेक्षा भंग झाला तर त्रास कमी होतो. आणि कोणाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाची तरी अपेक्षा लक्षात घेऊन पूर्ण करायला शिकलं पाहिजे त्यात वेगळाच आनंद असतो. जगायचं तर सर्वांनाच आहे आणि स्वतःसाठी तर जगलंच पाहिजे पण स्वतःसाठी जगत जगत कोणासाठी तरी जगण किती आनंद देणारं असत ते अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. आयुष्याच गणित कधीच चुकत नसतं, चुकतो तो चिन्हांचा वापर करणं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखी येतातच. आयुष्यात कोणाशी बेरीज करायची, कोणाला कधी वजा करायच, कधी कोणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि उत्तर आपोआप मनासारखी येतात. आयुष्याच्या या काटेरी वाटेवर चालताना कधीतरी फुले विखुरली जातातच. अपयशांची मालिका संपून कधीतरी यश मिळतच. पण कधी कधी अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवून निरपेक्षतेचा आनंद ही घेतला पाहिजे. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय असत, आवड आणि निवड यांची घातलेली उत्तम सांगड म्हणजेच खर सुंदर आयुष्य आहे. मी माझं “आयुष्य १०० दिवसाचं”च आहे असं समजून प्रत्येक क्षणाला सकारात्मकरित्या जगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हीही कराल का.....?

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.


Comments

Popular Posts