मी शोधलेला "चोर"


          आपली मानसिकता कुठल्या दिशेने चाललीय कळत नाहीये. सरकारी मालमत्तेची तोडफोड, नुकसान किंवा चोरी, असली प्रकरण तर रोजची होत चालली आहेत. आपल्याच घरात कोणी चोरी करत का......? आपल्याच घरातल्या वस्तूच कोणी नुकसान किंवा तोडफोड करत का......? नाही ना......? मग त्या तेजस एक्सप्रेस मध्ये जी मालमत्ता आहे ती कोणाची होती......? आपलीच ना......? आपल्याच घरात चोरी करायची तोडफोड करायची आणि पुन्हा त्याची भरपाई आम्ही टॅक्स मधून करायची. हे विचित्र कालचक्र असंच सुरू राहणार आहे का? नुकसान कोणाचं होतंय? आपलंच होतंय ना......? आम्ही रेग्युलर इनकम टॅक्स भरतो, प्रोफेशनल टॅक्स भरतो आणि विविध कर न चुकता भरतो आणि त्यातूनच सरकारी यंत्रणा आपल्यासाठी चालते. त्याच टॅक्स मधून सरकार आपल्या साठी सोयी सुविधा उपलब्ध करते आणि आपण आपल्याच मालमत्तेची तोडफोड करून आपलंच नुकसान करून घेतो. हे सगळं का......आणि कशासाठी......? त्या तेजस एक्सप्रेस मध्ये चोरी म्हणजे माझ्या घरात चोरी झाली असा त्याचा अर्थ घ्यायला आपण कधी शिकणार आहोत......?

          परवा मी माझ्या "खेळ मनाचे" ब्लॉग मधील एक लेख fb आणि व्हाट्सअप्प वर पोस्ट केला होता, "कला" जीवन जगण्याची. तो लेख मी पोस्ट केल्यावर बऱ्याच जणांनी दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड केला, काहींनी स्वतःच्या fb वॉल वर टाकला, काहींनी विचारून share देखील केला. व्हाट्सअप्प वर तो फिरत फिरत पुन्हा माझ्या व्हाट्सअप्प च्या एका ग्रुप वर आला. मला खरंच खूप छान वाटलं. आपले विचार लोकांना पटतात ते share करतात हीच एका प्रामाणिक लेखकाची कमाई असते. खूप सार्थक झाल्यासारखं वाटलं. नंतर मग मी त्या व्हाट्सअप्प ग्रुप वर फिरत फिरत आलेला माझाच ब्लॉग खाली scroll करून पाहिला तर मला पहिल्यांदा धक्काच बसला. लेखाच्या शेवटी मी माझं नाव "डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे" असं नेहमी लिहितो. थोडक्यात ती माझी signature असते, की हा लेख माझा आहे हे सांगण्यासाठी. पण त्या लेखाच्या खाली वेगळंच नाव होतं. (अर्थातच ओळखीचं होतं म्हणून जास्त धक्का बसला) आणि नावाच्या खाली "MD" लिहिलं होतं. ते पाहिल्यावर पहिल्यांदा मला खूप वाईट वाटलं. "एक चोर" आपल्या लेखाची चोरी करतोय हे काही काळ सहन झालं नाही.

          पण नेहमीच्या सवयी प्रमाणे लगेच थोडा सकारात्मक विचार केला की त्या व्यक्ती ने चोरी केली पण माझं काही गेलं का? खरंच माझं काही नुकसान झालं का? मुळीच नाही. आणि त्याने चोरी करून स्वतःच नाव टाकून का असेना पण माझे विचार त्याला आवडले, पटले म्हणूनच त्याने share केले. पद्धत चुकीची जरी असली तर आपला उद्देश सफल झाल्याचं सकारात्मक समाधान मला मिळालं. एखाद्या सरकारी मालमत्तेची चोरी करण्यापेक्षा अशी चांगल्या विचारांची चोरी करणं कधीही फलदायीच. खरंच या वैचारिक चोराच्या चोरीतुन खूप काही शिकायला मिळालं. अशा वैचारिक चोरांनी असेच विचार चोरून जर चांगल्या विचारांचा प्रसार केला आणि ते विचार आमलात आणले तर सरकारी मालमत्तेच्या चोऱ्या नक्कीच थांबतील. कधी कधी अजिबात जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा आपण कमालीचे आग्रही, हट्टी असतो. पण आपल्याला आवश्यक सुखसोयींची आपण अशी तोडफोड, चोरी करणं किती चुकीचं आहे. आपल्या मानसिकतेतला हा विरोधाभासच खूप घातक आहे. त्यात बदल व्हायला हवा. मी शोधलेला हा आगळावेगळा वैचारिक "चोर"च हा सकारात्मक बदल घडवू शकतो.

टीप - त्या माझ्या चोर मित्राला एक विनंती आहे, फक्त विचार चोरू नकोस ते आमलात आणायला पण शिक. त्याला माझा हा लेख पण चोरायचा असेल तर बिनधास्त चोर पण खालचं नाव edit करताना वरच लेखातलं माझं नाव edit करायला विसरू नको नाहीतर उगीच तुझी चोरी पकडली जायची. आणि माझ्या समाजोपयोगी विचारांच्या प्रसारातला असलेला तुझा खारीचा वाटा वाया जायचा.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts