"...... आणि याच साठी मिळवलं होत का हे स्वातंत्र्य?"

          आज स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत......? ज्या भारत देशाचे स्वप्न आपण सर्वजण मिळून पाहत आलो आहोत तो आपला भारत देश हाच आहे का......? उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा......? कोण शोधणार याचे उत्तर......? काही तरी चुकल्यासारखं वाटतंय ना......?७० वर्षे झाली, उद्या ८० ही होतील आणि आपण आपल्या या प्रजासत्ताक राष्ट्राचे शतक सुद्धा साजरे करू, पण तुम्हाला वाटते का त्या वेळी काही बदललेले असेल? जर हे असेच चालत राहणार असेल तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल. कुठे तरी चुकतंय......? हो नक्कीच चुकतंय...... आपला काल आज आणि उद्या ह्या तिन्ही चा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि हा विचार कुठल्या तरी एका पिढीला करावाच लागतो. मग तो आपणच का करू नये? "...... आणि याच साठी मिळवलं होत का हे स्वातंत्र्य?" याचा सारासार विचार आजच्या तरुणाईने करावा अशी वेळ आता नक्कीच आली आहे.

          कधी ही न मावळणाऱ्या जुलमी इंग्रजी सत्तेचा सूर्य अखेर १५ ऑगष्ट १९४७ ला मावळला होता. आणि तो मावळला होता तो प्रभावी स्वातंत्र्य लढ्यामुळे आणि धैर्याने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला आणि आपला देश स्वतंत्र झाला. सर्व जगा समोर एक आदर्श असणारा आमचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. पण याच प्रभावी, तेजस्वी आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य लढ्याचा उज्वल इतिहास दाखवणारे एक ही स्मारक आमच्या या देशात असू नये ह्या पेक्षा शरमेची दुसरी काय गोष्ट असेल. येणाऱ्या पिढीला दाखवण्याकरिता एक ही असे स्थळ किंवा स्मारक नाहीये जिथे आम्ही त्यांना दाखवू शकू कि हे बघा, ७० वर्षापूर्वी आपण इथे होतो, असा होता आपला देश, हे स्वप्न होते आणि आता बाहेर बघा आमचा हाच भारत...... हे पाहिल्यावर तरी कदाचित येणाऱ्या पिढीला काही तरी चुकत असल्याची जाणीव होईल आणि त्यांचे विचार बदलतील. "जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश था मेरा" असं आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याची वेळ आज आली आहे. सोन्याची चिड़िया तर कुठे उडून गेली ते माहिती नाही पण आज लहान मुलांना दाखवायला त्यांची चिऊताई सुद्धा आकाशात शोधावी लागते.

          आपण स्वतंत्र झालो खरे, पण आपण खरोखरच प्रगल्भ झालो का......? भारतीय स्वातंत्र्यात मोलाची भूमिका बजाविणा-या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते केवळ आणि केवळ उपभोगण्यासाठीच. पण कधी कधी अस वाटत मिळालेलं हे स्वातंत्र्य आपण उपभोगत नसून ओरबाडत आहोत. “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मुळीच नाही,” हेच कदाचित आपण सारे विसरत चाललो आहोत. प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक क्षेत्रांत, चढाओढ आणि जीवघेणी स्पर्धा लागलीय. स्वतःच्या उत्कर्षापुढे, इतरांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा उत्कर्ष विचारात घ्यायलाही आज नेमका वेळ नाहीये या नव्या भारतीय तरुणाई कडे. सार्वजनिक ठिकाणी बिनधोकपणे थुंकणे, घाण करणे,सार्वजनिक मालमत्तेची अंधाधुंदपणे नासधूस करणे, भावना भडकविणाऱ्या लोकांची गुलामगिरी करणे, अप्रामाणिकपणा अंगी बाळगणे, इतरांशी खोटेपणाने वागणे, भ्रष्टाचार, लाच देणे घेणे यांना विरोध न करता प्रोत्साहन देणे, सिग्नल न पाळणे, अपघातग्रस्तांना मदत न करणे, कामावर वेळेवर न पोहोचता, काम संपायच्या आधीच लवकर निघणे, पैशाच्या तराजूत प्रत्येक गोष्टीची तुलना करून दुर्बलांवर रुबाब दाखविणे, सार्वजनिक जबाबदारीच्या नावाखाली फक्त आणि फक्त स्वतःचीच सोय करून घेणे आणि निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणे, या आणि अशा अनेक गोष्टींचे अनिर्बंध स्वैराचार करण्यासाठीच मिळवलं होत का हे स्वातंत्र्य......?

          ‘जगणे आणि मरणे नेमके काय असते?,’ हे कळण्यासाठी एकदातरी भारतीय सैनिकाला जवळून अनुभवले पाहिजे, त्याला जाणून, समजून उमजून घेतले पाहिजे. अशा सैनिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना देशसेवेनंतर झगडावे लागते. ‘या संघर्षापेक्षा सीमेवरची लढाई परवडली,’ असे या शूर जवानांना नक्कीच वाटत असावे. जो बळीराजा सा-या देशाला अन्न देतो, त्याच बळीराजाला खायला एकवेळचे अन्न मिळत नाही. जाहीर सभेमध्ये शेतक-यांच्या प्रश्नांवर गप्पा मारणा-या, बळीराजाच्या आत्महत्येवर अभ्यासपूर्ण भाषण ठोकणा-या, शिवाय वर सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची फळे चाखणा-या सुखवंतांना, या बळीराजाच्या घामाची फळे आणि अश्रूंची किंमत सहजासहजी कशी कळेल? शेतकरी,कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांना जगण्याचे तरी स्वातंत्र्य आहे का......?

          मग या अशा परिस्थितीत देशसेवा नक्की कोणती करायची?कशी करायची? कुणी करायची? कधी करायची? हाच संभ्रम, या सुजाण भारतीय तरुणाईच्या मनात निर्माण होतो. रोज आपण आपल्या आयुष्यात साधे साधे नियम पाळून, सार्वजनिक संकेत पाळूनही देशसेवा करू शकतो ना......, हेच वेळेवर आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. घराघरांतून चालणारे टी.व्ही., केबलचे मुक्त प्रक्षेपण, मोबाईल, कॉम्प्युटरचा वाढता दुरुपयोग, दहीहंडी,गणेशोत्सव, नवरात्र, होळी, आपले लग्न समारंभ तसेच, एकूणच सर्व सणांचे आणि परंपरांचे सार्वजनिकरित्या बदलत चाललेले विचित्र रूप पाहता, आपल्या भावी पिढीसमोर आपण याच स्वैराचाराचे उदाहरण तर नाही ना घालून देत आहोत, हा अंतर्मुख करणारा विचार डोक्यात आल्याशिवाय रहात नाही. म्हणून वेळीच या स्वैराचाराला रोखून, स्वातंत्र्याची पताका अभिमानाने पुढच्या पीढीच्या हाती सोपवायची असेल, तर स्वतःमध्येच छोटे छोटे बदल घडवत ही देशसेवा करता येऊ शकते हे आमच्या सारख्या तरुण पिढीने समजुन घेण्याची गरज आहे.

          आज आपला देश ज्या वेगाने प्रगती करतोय त्याच्या दुप्पट वेगाने विविध समस्यांनी वेढला जातोय. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र आपण अडकून बसलोय आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी परदेशियांशी लढणं कठीण च होत पण आज स्वकियांशी लढण त्यापेक्षा जास्त कठीण होत चाललय. आपल्या देशाला महान आणि तडफदार नेते,राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा झालीच नाही. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणार्‍या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, वस्त्र, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची आजही भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज आपला तिरंगा दिमाखात फडकत असताना ते पाहताना मनात आलं की खरचं भारतात शांती आहे का? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे का? अन्नदाता शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार्‍या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे का? जोडून आलेल्या सुट्टी मुळे आजचा हा स्वातंत्र्य दिन भारतीय तरुणाईसाठी फक्त आणि फक्त हॉलिडे सारखा वाटत आहे.

           ७० वर्ष झाली पण खरच आपण स्वतंत्र झालो आहोत का?असा प्रश्न पडतोय. राजे- रजवाडे गेले आणि आता घराणेशाहीतले आमदार-खासदार आणि मंत्री आले, त्यांना जस वाटत तसा आमच्या देशाचा रथ ते आज चालवत आहेत आणि आम्ही मस्त आरामात या रथामध्ये बसलो आहोत. सर्वांना वाटतंय आमचा हा रथ फार जोरात पळतोय. पण मित्रांनो या रथाची चाके खोलवर रुतली गेली आहेत. गेली कित्येक वर्षे आपण एकाच जागेवर अडकून पडलोय. रथ चालवणारे आपली लगाम सोडायला तयार नाहीयेत आणि आमच्या सारखे बसलेले आपआपली सीट सोडायला तयार नाहीयेत! काही बिचारे लोक आहेत जे आपलं सर्वस्व विसरून, आपली मिळालेली जागा सोडून हा रुतलेला रथ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा वेळी बहुसंख्य समाज आपआपल्या सीट वरून फ़क़्त त्यांच्याकडे बघण्याचा कार्यक्रम करत बसला आहे. कसा पुढे जाणार मग हा आपल्या देशाचा रथ? कोणाला कसली चिंता नाहीये. 'आपलीच गाडी,आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी'एवढाच विचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढा मोठा पसारा असलेला हा भारत देशाचा रथ पुढे ढकलायला बळ कमी पडतंय. अशावेळी थोडी तरी जाण असलेल्या आपल्या तरुणाईने आता आपल्या जागेवरून उठण्याची वेळ आली आहे.

          "साला सारा सिस्टीम ही खराब है" असं म्हणून म्हणून ७० वर्षे ओलांडली. काय बदल घडला? काहीच नाही...... उलट परिस्थती अजून बिकट होत चालली आहे, बिघडत चालली आहे. का घडले असेल असे? कारण अडकुन बसलेल्या या रथातली आपआपली जागा कोणी सोडायला तयार नाही. आपण खरच काही केलं ही नाही आणि करणाऱ्या एखाद्याला कधी साथ ही दिली नाही. केवळ एक प्रेक्षक बनून राहिलोय आणि आपल्याच या देशाचा तमाशा आपल्याच डोळ्यानी बघत आलोय. ज्या व्यवस्थेला आपण रोज शिव्या देतो, ज्या व्यवस्थेला आपण निव्वळ दोष देत राहतो,त्याच व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण आहोत याचा कुठेतरी विसर पडत चाललाय. आपण आपल्यात बदल घडवायला तयारच नाही आहोत. आपणच गेली ७० वर्षे बदललो नाहीत तर व्यवस्था तरी कशी बदलेल? ज्या व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग जर अपंग झाला असेल ती व्यवस्था तरी कसं काम करेल. सध्याच्याच व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा खूप काही घडवता येऊ शकते पण या वेळी फक्त बघण्यापेक्षा काही तरी कृती करूया. आता त्यासाठी प्रत्येकाने गांधी किंवा भगतसिंग बनण्याची गरज नाहीये, ते तसे होता ही येत नसते. गांधी आणि भगतसिंग हे आपल्यासारख्या हजारो-लाखो लोकांतूनच घडत असतात. आपण स्वतःला घडवूया आपोआप आपल्यातूनच उद्या गांधी,भगतसिंग सारखे लोक जन्माला येतील. ते येतील तेव्हा येतील, पण सध्या मला स्वतःला घडवणे तर माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी करणारच......!

          स्वातंत्र्य दिनाच्या ह्या दिवशी मी प्रतिज्ञा करतो की, मी जी प्रतिज्ञा माझ्या शाळेची १० वर्षे रोज नुसती म्हणत राहिलो आज पासून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल. तुम्ही ही नक्की करा.

७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देश बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts