"वाट चुकलेली पाखरं"


          या तारूण्याचं रूपच काहीस वेगळं असत ना.......? एक निराळा उत्साह, उमेद, जिद्द, ध्येय, आनंद आणि अविट तारुण्यात रंगवत गेलेलं आपलं हे सुंदर विश्व...... हे सगळं कसं हेवा वाटणारं आणि हवहवसं वाटणारं आहे, पण आजकाल हे तारुण्य भरकटत चाललय की काय असा प्रश्न उभा राहतोय. पहाटेच्या सुंदर धुक्यापेक्षा सिगारेट चा धुर च जास्त आवडतोय आजच्या तरुणाई ला...... सदविचारांच्या नशे पेक्षा वेगळ्याच नशेच्या धुंदीत असते आजची तरुणाई...... स्वच्छ भारताच स्वप्न पाहणाऱ्या या देशात रस्त्यावर गुटखा, तंबाखु खावुन थुंकते ही तरुणाई...... सांसारिक, सामाजिक बांधिलकीत न अडकता, नेत्यांच्या नावाने नुसत कार्यकर्ता बनुन अडकलीय आजची तरुणाई...... म्हणूनच एकदा विचार करावासा वाटला "वाट चुकलेली ही पाखरं" पुन्हा येतील का दारी?

          मला डॉक्टरच व्हायचय, मला इंजिनीयरच व्हायचय अशा चाकोरीबद्ध करीयरच्या विळख्यातून काही तरुण, तरुणी केव्हाच बाहेर पडले आहेत. आजकाल आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यात मुले आणि मुलीही जिगर दाखवतात. भारतीय अर्थकारणात नळ दुरुस्तीपासून ते स्वतःच्या कंपन्या उभारणारी ही मुलं बघता बघता बिजनेस आयकॉन बनली आहेत. शिक्षण क्षेत्रात आवडीने काम करतानाही काही तरुण दिसतात. मोठा अधिकारी व्हायचा निश्चय करून जिद्दीने दिवसरात्र एक करणारी तरुणाई सुद्धा आज आपण पाहतोय. भीषण दुष्काळाने डबघाईला आलेल्या शेतीत काम करायला आणि शेतीत काहीतरी आमूलाग्र बदल घडवून आणायचा म्हणून राबयलाही काही तरुण तयार आहेत. अस असताना काही तरुण का भरकटत चालले आहेत. ते स्वतःच्या मनातला स्वच्छंदी पाण्याचा झरा का आडवून धरत आहेत?

          तरुणांची मने ही उंचावरुन पडणाऱ्या धबधब्यांसारखी स्वच्छंदी असतात. ती ओढ्या नाल्यातुन प्रगतीचा मार्ग काढत शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला झोकुन देतात. नंतर सांसारिक व सामाजिक क्षेत्राद्वारे नदीच्या खळखळाटात विलीन होतात आणि शेवटी प्रचंड अशा ज्ञानरूपी सागराला जावून मिळतात. पण आजकाल ही तरुणांची मनं कुठे तरी ओढ्यात किंवा नदीत बंधारा लावून अडवली जात आहेत. आयुष्यात नक्कीच काहीतरी उत्कृष्ट करून दाखवू शकणारे हे तरुण राजकीय हव्यासापोटी कार्यकर्ता म्हणून अडवले जातात आणि हेच तरुण मी अमक्याचा कार्यकर्ता, मी तमक्याचा कार्यकर्ता अस स्वतःला म्हणवून घेत आयुष्यभर निष्कारण अडकुन पडतात. अशा तरुणांचा ज्ञानरूपी वैचारिक प्रगतीचा प्रवाहच खुंटतो. काही तरुण तर क्षणिक सुखाच्या शोधात नशेच्या चक्रव्युहात अडकून राहतात आणि आयुष्यभर स्वतः मधल्या अस्मितेला आणि कर्तुत्वाला गमावून बसतात.

          सतत चुकीच्या गोष्टींच आणि चुकीच्या प्रवृतींच केलेलं अनुकरणच  या तरुणांच्या भीषण परिस्थितीला कारणीभूत आहे. त्यात अपुरे संस्कार, मोजक शिक्षण किंवा वैचारिक दारिद्रय या गोष्टींमुळे तरुण दिशाहीन होतात. आणि एकदा मार्ग चुकला की पुन्हा योग्य मार्गावर येणं खुप कठीन होवून जात. आजची शिक्षण पद्धती आणि संस्कार सुद्धा माणूस निर्माण करणारे न राहता पैसा निर्माण करणारी मशीन बनविण्याचा कारखाना झालीय. जो तो फक्त पैश्याच्या मागे धावतोय, पण हा पैसा आपल्याला धावत धावत कुठे घेवुन चाललाय हे बघायला ही कोणाकडे वेळ नाहिये. तरुण पीढी पण याच अनुकरण करत कसलाही विचार न करता नुसत धावतीय त्या मृगजळाच्या पाठीमागे...... तरुणांची ही अधोगती कशामुळे झाली? आपली परंपरा, संस्कृती, संस्कार, विचार कुठ गेले? हे सगळ पुन्हा उभ राहील पाहिजे. ही परीस्थिती बदलली पाहिजे, ती नक्कीच बदलली जाऊ शकते. त्यासाठी आपल्या समोर सकारात्मक वैचारिक दूरदृष्टी हवी आहे, त्याचाच अभाव आज कुठतरी दिसून येतो.

          सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर या सर्व प्रश्नांची बरीच उत्तरं मिळतील. आजचा तरुण हा पत्राकडून ई मेलकडे, हितगुज आणि गप्पागोष्टी कडून chatting कड़े, सूर तालाकडून DJ कडे, खेड्याकडून शहराकडे, पृथ्वीवरून मंगळाकडे आणि अंधश्रद्धेकडून निष्ठेकडे जात आहे. पण मला असे वाटते आजही हा तरूण विशिष्ट समाज रचनेकडून वैचारिक समाज बांधिलकीकडे जाणारा असला पाहिजे. तरच अशा सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेली तरूण पिढी एक आदर्श पिढी असेल. आणि ही तरुण वयातच "वाट चुकलेली पाखरं" नक्कीच मार्ग शोधत योग्य वळणावर येतील.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.




Comments

Popular Posts