“A” for आयुर्वेद


          रात्रीचे पावणे दोन वाजलेले, सव्वा एक वाजता आलेला एक पेशंट पाहून घरी आल्यावर नुकताच डोळा लागला होता. रात्रीच्या निरव शांततेत जोरात वाजलेल्या फोनच्या रिंग मुळे मला पुन्हा जाग आली. “बाळाला लय भयंकर ताप आलाय लवकर खाली या”, हे बाळाच्या नातेवाईकाचं वाक्य जसच्या तसं मला ऐकवणाऱ्या माझ्या स्टाफ ला “हो आलोच” असं म्हणून मी लगेच खाली धाव घेतली. बाळाला नीट तपासल्यावर लक्षात आलं कि त्याला न्युमोनिया चा ताप आहे. त्याच्या वडिलाला विचारलं “बाळाला ताप कधीपासून येतोय”. ते म्हणाले “चार-पाच दिवस झाले असतील” त्यांचं असं सहज उत्तर ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं कि हे बाळ नक्कीच किमान एक आठवडा झालं आजारी असेल. “अहो बाळाला न्युमोनिया झालाय एडमिट करावं लागेल......” माझं हे बोलण मध्येच थांबवून बाळाचे वडील म्हणाले “तुम्ही फक्त आता ताप कमी करायचं औषध दया, आम्ही उद्या सकाळी-सकाळी लवकर जाऊन बालरोगतज्ज्ञाकडे बाळाला एडमिट करतो”. कपाळावर कायमचं अदृश्य प्रश्नचिन्ह असलेला मी, पडलेले काही प्रश्न निमुटपणे गिळून त्या बाळाला व्यवस्थित उपचार देऊन पहाटे चार वाजता घरी येऊन झोपलो. डोळ्यात झोप आणि डोक्यात प्रश्न...... मला वाटत हा रात्रीचा प्रसंग प्रत्येक BAMS डॉक्टरच्या आयुष्यात किमान एकदा तरी येऊन गेला असेलच. आणि या प्रासंगिक लघुपटाचा उत्तरार्धही काय असतो, हे सर्व BAMS डॉक्टरांना माहिती आहेच. झोप “अर्धवट” आणि उपचार ही “अर्धवटच”...... पण डोक्यातले प्रश्न मात्र “पूर्ण” ताकतीनिशी डोळ्यातली “अर्धवट” झोप घालविण्याचा प्रयत्न करत होते. माझं नेमकं चुकलं तरी काय......? मी दिलेला सल्ला चुकला कि माझं निदान करणं चुकलं? कि चार चार दिवस बाळाचा ताप घेऊन घरी बसणाऱ्या त्या पेशंटला रात्री येऊन उपचार देणच चुकलं? कि आलेला राग निमुटपणे गिळण चुकलं? कि माझं BAMS असणच चुकलं? या आणि अशा अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात घेऊन कसाबसा झोपलो खरा पण प्रश्नांचं वादळ डोक्यात निरंतर सुरूच होत. “A for Apple, B for Ball, C for Cat, D for Dog” सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या या नर्सरीतल्या पाठाच्या आवाजाने मला जाग आली.  आणि डोक्यात पुन्हा तेच विचार सुरु झाले. “A” for आयुर्वेद, “B” for BAMS, “C” for चूर्ण, “D” for डॉक्टर...... आणि BAMS ला प्रवेश घेतल्यानंतरचा माझा आयुर्वेदातल्या नर्सरीचा पाठ आठवला......

हिताहितं सुखं दु:खमायुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेद: स उच्यते॥ - चरक संहिता १/४०

          हाच तो पहिला संस्कृत श्लोक, जो मी असाच माझ्या मुलीसारखा पाठ करण्याचा प्रयत्न केलेला होता. मुळात संस्कृत श्लोकामध्येच वर्णन केलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती वाचताना सुरुवातीला फारच गम्मत वाटायची. असं वाटायचं आपण इथे डॉक्टर व्हायला आलोय कि संस्कृत साहित्याचा अभ्यास करायला आलोय. पण हळूहळू या श्लोकांचे अर्थ समजत गेले आणि आयुर्वेदाच्या आरोग्य खजिन्याचं एक एक पान उलघडत गेलं. आपल्या आयुष्यातील हितकारक, अहितकारक, सुखकारक, दु:खकारक, व्याधीकारक गोष्टींचा ऊहापोह आयुर्वेदात अतिप्राचीन काळापासून केला गेला आहे. A State of complete physical, mental and social well being and not merely the absence of disease or infirmity. ही आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९४६ साली सांगितली पण हीच आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे.

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम । आतुरस्य विकार प्रशमणम् ॥

          आधुनिक आयुर्विज्ञान आणि आयुर्वेद यात असलेलं हे साधर्म्य नंतर च्या अभ्यासक्रमात दिसत गेलं. आणि त्यात आवड हि निर्माण होत गेली पण नंतरच्या काळात वैद्यकीय सेवा करताना रुग्णांचा कल आणि आधुनिकतेची ओढ यामुळे आधुनिक आयुर्विज्ञानाकडे कल वाढत गेला. आणि Allopathy Practice करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आयुर्वेद शिकत असताना आमच्या अभ्यासक्रमात आधुनिक आयुर्विज्ञानाचा (Allopathy) बराचसा भाग असायचा. वाचत असताना हे लक्षात यायचं कि आधुनिक शास्त्र म्हणून जे आज लिहून ठेवलंय तेच संस्कृत भाषेत हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदात लिहून ठेवलं गेलं आहे. तरी पण आज आयुर्वेदाला दुय्यम दर्जा का मिळतोय याच कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. हे शास्त्र खूप जूनं आणि संस्कृत भाषेत आहे, म्हणून निव्वळ या कारणाने जर मागे पडत असेल तर यात सुधारणेची आणि संशोधनाची गरज आहे. सुधारणा आणि संशोधन न करता फक्त हेटाळणी जर होत राहिली तर भविष्यात आपण या सुंदर वैद्यक शास्त्राला मुकणार हे नक्की. कोणत्याही रुग्णाला उपचार करताना तो बरा होणे आणि नंतर त्याचं स्वास्थ्य अबाधित राहणे महत्वाचे असते. त्यात तो कुठल्या वैद्यकशास्त्रामुळे बरा झाला हा वाद घालण्यात काही अर्थ नसतो. वेगवेगळ्या वैद्यक शास्त्रांचं महात्म्य सांगत बसण्यापेक्षा या सर्व वैद्यकशास्त्रांचा योग्य समन्वय होणं हे रुग्णांसाठी अधिक फायद्याचं ठरेल असं माझ मत आहे. शेवटी रुग्ण हाच कोणत्याही वैद्यकशास्त्राचा केंद्रबिंदू असतो. आणि तो पूर्ण बरा होणं हेच कोणत्याही वैद्यकशास्त्राचं मूळ ध्येय असतं. असं असताना एखाद्या वैद्यकशास्त्राला निष्कारण दुय्यम स्थान देवून आपण नेमकं साध्य तरी काय करतोय हेही लक्षात घेतलं पाहिजे. खरंच, BAMS डॉक्टरांचं आयुष्य असंच समस्यांची उत्तर शोधण्यात वाया जाणार आहे का? समाजात BAMS डॉक्टरांना असा दुय्यम दर्जा का मिळतोय? याचा कुठेतरी स्वतः सर्व BAMS डॉक्टरांनी, रुग्णांनी आणि समाजानी विचार करण्याची वेळ आज आली आहे.

          आपल्याचं देशाचं अतिप्राचीन असलेलं हे वैद्यकशास्त्र आज राजाश्रयासाठी झुंझतय हे पाहताना वाईट वाटत. आयुर्वेदाची ही अवस्था होण्यात बराच मोठा वाटा BAMS डॉक्टरांचाच आहे हेही मी ठाम पणे सांगतो. कारण आम्ही शिकलेल्या आयुर्वेदाला आम्हीच कायम दुय्यम दर्जा देत राहिलो आहे. आज BAMS डॉक्टरांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन पाहता यात बऱ्याच प्रमाणात चूक आमचीच आहे हे लक्षात येतं. आमच्या पैकी किती डॉक्टर हे रुग्णांना आयुर्वेदीक उपचार घेण्याचा सल्ला देतात? खूप कमी डॉक्टर्स आज शुद्ध आयुर्वेदिक practice करतात. मी असं मुळीच म्हणणार नाही कि आम्ही सर्व BAMS डॉक्टरांनी फक्त आयुर्वेदिक practice च केली पाहिजे. पण किमान आम्ही जे शिकलोय किंवा ज्या शास्त्रामुळे आम्ही घडलोय त्या वैद्यक शास्त्राची अशी अवस्था होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आमच्या BAMS च्या अभ्यासक्रमात Modern Allopathy Medicine चा बराचसा भाग आहे. त्यामुळे कोणी कोणती Practice करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या आयुर्वेदाच्या राजाश्रयासाठी आम्ही प्रत्येक BAMS डॉक्टरांनी खारीचा वाटा उचललाच पाहिजे. आपल्या आयुर्वेदाला श्रेष्ठ स्थान आपण सर्वांनी मिळून दिलंच पाहिजे. ज्या आयुर्वेदामुळे आपले सर्व महापुरुष निरोगी आयुष्य जगू शकले, ज्या आयुर्वेदामुळे आपले पूर्वज आजारांच्या विचित्र विळख्यात कधीच अडकले नाहीत, ज्या आयुर्वेदाने आपल्या सर्वांनाच सुंदर निरोगी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र दिला त्या आयुर्वेदाला आज आपली गरज आहे. प्रत्येक BAMS डॉक्टरांनी आपण करत असलेल्या practice चा आणि आयुर्वेदाचा समन्वय साधून रुग्णांना उपचार दिले तर नक्कीच बदल घडेल.

          आज BAMS डॉक्टरांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोज नवीन समस्या समोर उभी असते. कधी हॉस्पिटल नोंदणी, कधी Bio Medical Waste, कधी GR, कधी बातम्या, कधी रुग्णांची तक्रार, कधी कोणी म्हणत हे तुम्हाला allowed च  नाही, कधी कोणी म्हणत delivery सुद्धा allowed नाही, या आणि अशा कित्येक समस्यांना रोज सामोरे जाताना practice करण खरंच अवघड होत चाललं आहे. हॉस्पिटल नोंदणी, Bio Medical Waste ते नियमानुसार योग्य च आहे आणि ते प्रत्येक BAMS डॉक्टर काटेकोर पणे करतात सुद्धा. पण बाकी समस्यांना तोंड देताना BAMS डॉक्टरांची निष्कारण होणारी गळचेपी आश्चर्यकारक वाटते. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र हा विषय आम्हाला आमच्या अभ्यास क्रमात शिकवला जातो. आयुर्वेदिक संहितेत सुद्धा प्रसवक्रियेचे वर्णन आहे. मग असं असताना BAMS डॉक्टरांना Delivery करता येते का? हा प्रश्न उभा करण्याची गरजच काय? प्रसव क्रिया हा काही कोणत्या एकट्या वैद्यकीय शास्त्राचा विषय नाही. ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती जगातल्या कोणत्याही डॉक्टरने केली तरी त्यात काही चुकीच असूच शकत नाही. फक्त अत्यावश्यक स्थिती मध्ये तारतम्य बाळगून योग्य निर्णय घेऊन योग्य उपचार रुग्णांना मिळणे ही सुद्धा सर्वच डॉक्टरांची नैतिक जबाबदारीच आहे. समजा एखाद्या रुग्णाला Allopathy उपचारच योग्य असेल तर किंवा एखाद्या रुग्णाचा आजार हा आयुर्वेदिक किंवा Homoeopathy या उपचार पद्धतीनेच बरा होणार असेल तर त्या त्या डॉक्टरांनी समन्वय साधून त्या त्या रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण ही सुद्धा त्यांची नैतिक जबाबदारी आहेच. आजारात विचित्ररित्या गुरफटलेल्या आणि स्वतःच आरोग्य गमावून बसलेल्या रुग्णांना योग्य सल्ला देऊन त्याचं आरोग्य पुनर्स्थापित करणं हेचं प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य आहे. शेवटी रुग्ण बरा होणे हेच महत्वाचे असते.

          एकदा एका CME (Continous Medical Education) मध्ये lecture देताना एका तज्ञ डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली होती ती अशी कि, या सृष्टीवर सर्वात प्रथम “अमिबा” हा bacteria आला त्यानंतर हळू हळू कालांतराने मानवाची निर्मिती झाली. मानव हा बुद्धीजीवी प्राणी असल्याने त्याने bacteria वर मात करायला सुरुवात केली. Bacteria ने सुद्धा त्यांचीच मुळ सृष्टी असल्याने मानवावर प्रतिहल्ला सुरु केला आणि त्यामुळे मानवाला वेगवेगळे आजार होऊ लागले. हे bacteria आणि मानवाचे टिकून राहण्याचे (servive करण्याचे) युद्ध आजतागायत सुरूच आहे. Bacteria नवनवीन रूपाने आपल्यावर हल्ला करतात आणि नवनवीन आजार जडवतात आणि मानव डॉक्टरांच्या रूपाने नवनवीन शोध लावून त्या bacteria वर मात करून तो आजार घालविण्याचा प्रयत्न करतात. हे युद्ध गेली कित्येक वर्ष झाले निरंतर सुरूच आहे. मग मानवासमोर आरोग्याच्या इतक्या समस्या असताना आपण आपआपल्यात युद्ध करण्यात काय अर्थ आहे. कोणत्याही वैद्यक शास्त्राचं श्रेष्ठत्व सांगत बसण्यापेक्षा योग्य समन्वय साधून रुग्णांना निरोगी ठेवणं हे अधिक महत्वाचं नाही का? एखादा रुग्ण Allopathy, Homoeopathy किंवा आयुर्वेद यापैकी कोणत्याही उपचाराने बरा होत असेल तर त्या त्या डॉक्टरांनी समन्वय साधण्यात काय हरकत आहे. रुग्ण पूर्ण पणे बरा होणं हेच कोणत्याही वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच ध्येय असतं. मला माहितीय हा समन्वय होणं खूप अवघड गोष्ट आहे पण यातल्या त्रुटी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढून प्रयत्न करायला काय हरकत आहे.

          आज रुग्णांचा Allopathy औषधांकडे कल जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक BAMS किंवा BHMS डॉक्टर पुढे जावून Allopathy Practice करण्यासाठी intership मध्ये बरीच मेहनत घेतात, रात्रंदिवस हॉस्पिटलच्या casuality मध्येच काढतात. एवढं करून सुद्धा allopathy मध्ये master असलेल्या डॉक्टरांएवढं Knowledge आम्ही नाही मिळवू शकत हे सत्यच आहे. पण आम्ही मिळवलेल्या कौशल्यामुळे अत्यावश्यक प्राथमिक उपचार देऊन रुग्णांचे प्राण आम्ही नक्की वाचवू शकतो हे ही तितकच सत्य आहे. आज खेड्यात practice करायला कोणी तयार नाही. यातला अजुन गमतीचा भाग म्हणजे खेड्यात राहणाऱ्या डॉक्टरला कोणी मुलगी द्यायला पण तयार नाही. असं असताना सुद्धा BAMS किंवा BHMS डॉक्टर्स मिळविलेल्या कौशल्याचा वापर करून खेड्यात राहून खेड्यातील रुग्णांना योग्य सेवा देण्याचं काम करतात, त्यांची गैरसोय दूर करतात. तरी सुद्धा BAMS, BHMS डॉक्टरांना दुय्यम दर्जा देणं हे चूकीच आहे. जगातल्या कोणत्याही डॉक्टरांना आपला रुग्ण बरा व्हावा असचं वाटत असतं आणि त्यासाठी ते अतोनात प्रयत्न ही करत असतात. BAMS डॉक्टर्स सुद्धा त्यांच्या कडे आलेला रुग्ण बरा होण्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण खरंतर जसं काही आजारात Allopathy उपचारा शिवाय पर्याय नसतो तसंच काही आजारात आयुर्वेद किंवा Homoeopathy उपचारा शिवायही पर्याय नसतो. त्याठिकाणी MBBS, BAMS किंवा BHMS डॉक्टरांनी त्या त्या रुग्णांना योग्य उपचार पद्धतीचा सल्ला देणं गरजेच आहे. तरच आयुर्वेद आणि Homoeopathy चा दर्जा वाढेल असं मला वाटत. आज रुग्णांचा प्रत्येक आजारासाठी Allopathy कडे असणारा कल पाहता BAMS आणि BHMS डॉक्टरांनी आयुर्वेद आणि Homoeopathy चा दर्जा वाढवून रुग्णांना योग्य दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. तरच आजची ही परिस्थिती बदलेल. आणि आपल्या “A” for आयुर्वेदाला आणि पर्यायाने BAMS डॉक्टरांना उत्तम दर्जा आणि राजाश्रय मिळेल.


टीप – या लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो. माझंच मत योग्य आहे असं मी अजिबात म्हणत नाही. मला जे जे वाटल ते ते मी लिहीलं आहे. काही गोष्टी चुकल्या सुद्धा असतील. तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

-    डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.


Comments

Popular Posts