क्षण


          उष्णतेमुळे तनामनाची लाही-लाही झाली असताना थंड वाऱ्याची एखादी झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना, तसेच काहीसे हे 'क्षण'असतात आपल्या आयुष्यातले...... हळुवार कधीतरी, कुठूनतरी गुपचूप संधी साधून येतात अन् तना मनात एक वेगळाच उत्साह निर्माण करून जातात. आपल्या मनात असलेल्या अपेक्षांची क्षणभर का होईना पण पूर्तता झाली असं वाटू लागत आणि आपलं मन सुखावून जात आणि मनासोबत आपणही भान विसरून बेभान होऊन जातो त्या क्षणात...... त्याच क्षणी लगेच आपण आनंदाच्या परमोच्च शिखरावर ताठ मानेने,अभिमामाने विराजमान होतो, बेधुंद होतो, बेभान होतो अगदी...... पण हे सगळं क्षणभर असतं, हो क्षणभरच असतं सगळ...... वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच असते ना......? पुन्हा ती कधी, कुठून, कशी येईल सांगता येत नाही पण तोपर्यंत असंच, असंच चालत राहायचं. असंच निरंतर आयुष्य जगत रहायच, त्या क्षणभर येणाऱ्या सुखद गारव्यासाठी..... पण आपलं हे मनं ऐकत नाही, तयार होत नाही त्या क्षणभर सुखासाठी...... आपल हे मन हट्ट करू लागत. जे हवं ते कायम स्वरूपी, क्षणभरासाठी नकोच...... इथूनच मग सुरु होते आपल्या मनाच्या वेदनांची कथा......

          फक्त सुखाचा हट्ट करताना सुख दुख मिश्रित क्षणांच्या गाठोड्यालाच आयुष्य म्हणतात हे आपण विसरून जातो. सुखाचा हट्ट नेहमी वेदनाच देऊन जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. मृगजळाप्रमाणे सुखाचा पाठलाग करत असताना झालेल्या वेदनेची जखम, जखमेचा व्रण आणि त्या  व्रणाची सल ही कायम मनात सलतच राहते. त्यातल्या काही जखमा ह्या वेदना विरहित असतात. त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही. पण काही जखमांतून आयुष्यभर रक्त ओघळत जात. त्या कधीच भरून येत नाहीत. कधी कधी रक्त ओघळलं तरी त्याची जाणं होत नाही. काही वेदना कळून न येणाऱ्या असतात. त्याच काही वाटत नाही. पण काही भरून न येणाऱ्या असतात. त्याचा असह्य त्रास होत राहतो आयुष्यभर...... पण माणूस सुखाचा हट्ट काही सोडत नाही. सुखाचा पाठलाग सुरूच असतो निरंतर...... वेदना मिळतात पण प्रत्येकवेळी मनाला भरारी घ्यावीच लागते नवीन सुखद क्षण शोधण्यासाठी......

          प्रचंड रहदारीच्या ऐन रस्त्यावर किंवा तुडुंब माणसाच्या गर्दीत जीव कासावीस होऊन जातो. त्या दुखद क्षणात कितीसा वेळ काढतो आपण,त्यातून मोकळी वाट मिळतेच ना......? किंवा काढावीही लागते. मोकळी वाट मिळाली कि तेव्हा कुठे मोकळा श्वास घेता येतो, तो क्षण सुखदच असतो ना......? तसेच काहीसे हे प्रत्येक क्षण जगावे लागतात आयुष्यात. या सुख दुःख मिश्रित क्षणांच्या गाठोड्यालाच आयुष्य म्हणतात. म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहावा कारण गेलेला क्षण परत येत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुखाच्या क्षणात सकारात्मकतेने सुख शोधण आणि त्याचा मनसोक्त आनंद घेण हेच खर आयुष्य आहे. कधी कधी अनिवार्यच असलेल्या दुखाच्या वेदना सहन करून त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यात खर परमोच्च सुख आहे. आपण जर या सुख दुख मिश्रित आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहिलं तर येणारी प्रत्येक झुळूक नक्कीच सुखद गारवा देऊन जाईल आणि सुखाचा हट्ट न करता मन सुखद क्षणाचा शोध घेत राहील.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts