"विचारांची श्रीमंती"


          वैज्ञानिक प्रगत तंत्रज्ञान आपल्याला क्षणात एका क्लिकवर पाहिजे ती माहिती उपलब्ध करुन देत आहे, मोबाईल सारखी विविध भौतिक साधने पायाशी लोटांगण घेत आहेत, अत्याधुनिक आकर्षक सुखसाधनांच्या या जगात आर्थिक श्रीमंती उच्च शिखर गाठत आहे पण समृद्ध जीवनाचा ध्यास बाळगणाऱ्या आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीला गरज आहे ती विचारांनीही श्रीमंत असण्याची. आजची आमची तरुण पिढी भरकटत चालली आहे. चांगल्या विचारांच्या अभावाने चुकीच्या विचारांचा पगडा तरुण पिढीवर बसत चालला आहे.  आम्हाला आज भौतिक प्रगतीसोबत वैचारिक प्रगतीचीही गरज आहे. आमचे विचार उत्तम असण्याची गरज आहे. आपले विचार उत्तम असले की आपोआपच जीवन समृद्ध व्हायला लागतं. आपल्या आयुष्याला समृद्ध बनवते ती "विचारांची श्रीमंती".

          परवा अशाच एका चुकीच्या विचारांचा पगडा असलेल्या चाळीशीतल्या तरुणाशी माझा वाद झाला.(हो चाळीस वर्षाचा असला तरी तरुणच होता तो कारण त्याचे अपक्व विचार अगदी नुकतच कॉलेजात गेलेल्या तरुणासारखे होते) वैचारिक मतभेद असले असते तर तो वाद न होता एक सुंदर चर्चा झाली असती पण अगदी चुकीचे विचार मांडून त्या तरुणाने वादच घातला.(त्याचा वाद घालण्याचा उद्देश मला अजुन पण नाही कळला) असो पण माझा विषय हा नाही मला एवढच म्हणायच आहे की आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीवरील चुकीच्या विचारांच्या पगड्यामुळे तरुण पिढी किती भरकटत चालली आहे हे पाहून खरच आश्चर्य वाटतं आणि राग न येता अशा तरुण पिढीची किव येते. महात्मा गांधी, फुले, आंबेडकर, सावरकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची देणगी असलेला 'तरुण' आज भुरसट विचारसरणी बाळगतो याची लाज वाटते.

          35 हजारांचा iphone घेऊन श्रीमंती मिरवणारे खुप भेटतील पण किमान 35 लोकांपर्यंत आपले चांगले विचार पोहोचवणारा खरा श्रीमंत असतो. 35 हजारांच्या iphone पेक्षा 10 हजारांचा android phone घेऊन त्या phone द्वारे 35 हजार लोकांना आपण आपल्यातल्या चांगल्या विचाराने समृद्ध करु शकतो. आज काल लाँग वे साइकलिंग च खुप खुळ आलयं. काही लोकं 2000km सायकल चालवतात. त्याने काही चांगल सिद्ध होत असेल असं मला तरी वाटत नाही.(आणि यात कुठे समाजासाठी उपयोगी अशा चांगल्या विचारसरणीचा पाया ही दिसत नाही)अशी साइकलिंग साठी 50 हजार रूपये फुकट घालवण्यापेक्षा किमान 3 गरीब गरजू विद्यार्थ्यांना 10-10km दूर असणा-या शाळेत जाण्यासाठी सायकल देऊन त्यांच्या भविष्याचा पाया रचणे म्हणजे खरी "विचारांची श्रीमंती" आहे असं मला तरी वाटतं. आणि त्याचीच या समाजाला गरज आहे.

          मी लेख लिहितो यात माझा कसलाही स्वार्थ नसतो. मी काही मोठा लेखक नाही किंवा कवी ही नाही. जे जे चांगल डोक्यात येत ते मी अगदी प्रामाणिकपणे कागदावर उतरवतो. हा माझा एक छंदच आहे. पण मी लिहित असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण जे विचार मांडतोय त्या विचारांशी आपण नकळत बांधील राहतो आणि नेमक तसच वागण्याचा प्रयत्न करतो. लिखानाने माणूस नक्कीच समृद्ध होतो पण त्या समृद्धिचा उपयोग, त्या विचारांचा उपयोग समाजासाठी व्हावा हा माझा प्रमाणिक उद्देश आहे. त्याच कारणाने मी लेख लिहून पोस्ट करतो. काहीना आवडतो, काहीना आवडत नाही, काही जन खुप चांगला प्रतिसाद देतात तर काही जन खुपच वाईट प्रतिक्रिया देतात. पण मी लिहितो ते सर्वांसाठीच. काही जन मला त्यांचे लेख कविता पाठवतात. खुप चांगले विचार असतात. अशी विचारांची देवाण घेवाण झाली की माणूस आपोआपच विचाराने श्रीमंत होत जातो.

              ''जो कर्म करी अहेतु निरंतर

                वेद तयास कळो न कळो रे

                ओळख पटली ज्यास स्वतःची

                देव तयास मिळो न मिळो रे'' - विदर्भकवी - डोंगरे

          A Bird sitting on the branch of tree isn't afraid of branch breaking because the bird trusts not the branches, but its own wings. Believe in yourself. जो स्वत:ला ओळखु शकतो तो जग जिंकु शकतो. आपल्या आतल्या चांगल्या विचारांच्या शक्तीला ओळखुन त्या विचारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. फक्त समोरचा जो करतोय त्यात उणीवा काढून, समोरच्या व्यक्तीला चुकीच ठरवून काही साध्य होत नसतं. आपल्या आतल्या उणीवा, चुका काढून त्यात सुधारणा करणं गरजेच असतं. फाजील आत्मविश्वास ठेवून आंधळेपणाने जगण्यात काही अर्थ नाही. सर्वांच्या मनात खुप चांगले विचारही असतातच, त्याच विचारांना प्रोत्साहन देऊन एक चांगल काम आपण नक्कीच करु शकतो.

          मी माझे मनातले चांगले विचार मांडत असताना मी त्या विचारांशी बांधील होत जातो आणि माझा वाचक ही त्याच्या मनातल्या चांगल्या विचारांशी कायम बांधील असावा असा हा स्पष्ट आणि स्वच्छ उद्देश आहे माझ्या लिखाणा मागचा. लिहित लिहितच मीही खुप काही शिकतोय, खुप काही समजुन घेतोय. स्वत:च्या विचारांना प्रगल्भ बनविण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा उपयोग सर्वांना व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे. हे लिहित असताना माझ्या वाचकाला माझा मुद्दा समजावा म्हणून मी काही गाजलेल्या कविता, काही विचारवंतांचे मुद्दे किंवा सुविचार लिहित असतो. पण त्यामागचा उद्देश एवढाच की माझे विचार तुमच्या पर्यंत अगदी सहज पोहोचावे, ते तुमच्याच मनातले विचार आहेत हे उमजावे. या अत्याधुनिक भौतिक श्रीमंतीच्या जगात "विचारांची श्रीमंती" ही तितकीच गरजेची आहे हेही लक्षात यावं याच उद्देशाने मी लिहितोय आणि लिहित राहीन.

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts