"जिलेबी"


          आपण जेवायला बसल्यावर स्वीट डिश म्हणून आनंदाने खातो ती "जिलेबी". एखाद्या कार्यक्रमात आग्रहाने खाऊ घालतात ती "जिलेबी". प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ असते ती "जिलेबी". मुलगी झाल्यावर वाटतात ती "जिलेबी". पण मुलगी झाली की त्या जिलेबीचा आनंद, आग्रह आणि आवड का कमी होत असेल बरं? "अरेरे मुलगीच झाली का?" असं का म्हणतात लोकं? त्यांच्याच पोटचा गोळा असतो ना तो मग मुलगी झाल्यावर एवढी निराशा का? 'ताटात स्वीट डिश म्हणून जिलेबी आवडते पण आयुष्यात स्वीट मुलगी नको' असं का? जितक्या आवडीने आपण जिलेबी खातो तितकीच आवड त्या मुली बद्दल का दाखवत नाही? या सुंदर सृष्टी ची निर्मिती झाली ती स्त्री मुळेच ना? आपल्या आयुष्याची सुरुवात झाली तीही स्त्री मूळेच ना? वैवाहिक जीवनाची सुरुवात केली तीही स्त्री सोबतच ना? आणि आयुष्याच्या शेवटी एक स्त्रीच मुलगी किंवा बायको बनुन साथ देते. पण आज एवढ्या प्रगतीपथावर असलेला माणुस कुठेतरी स्वत:च्याच मुलीला गृहीत धरायला, तिला सोबत घ्यायला विसरत चालला आहे की काय? असा प्रश्न आज माझ्या डोक्यात येतोय. समाजाने मुलीबद्दल एवढा तिरस्कार करण्याचं कारण तरी काय असेल? 'मुलगी नकोच' असा आग्रह का?

          'स्त्री भ्रूणहत्या' ही आपल्या समाजमनाला पोखरत चाललेली फार मोठी कीड आहे. याचा सामना कशा पद्धतीने करायचा हे एक मोठे आव्हान सरकार, सामाजिक संस्था आणि आपल्या सारख्या प्रत्येक सजग नागरिकापुढे आहे. या समाजात मुलीलाच दुय्यम वागणूक का? त्यांचा एवढा तिरस्कार का? त्यांच एक वेगळं अस्तित्व आहे, त्यांना त्याप्रमाणे जगु दया. 'मुलगी म्हणजे संकट' अशी समाजाची मानसिकताच स्त्री भ्रूण हत्येला कारणीभुत आहे. ही सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. अशा कितीतरी तेजोमय पणत्या विजवुन वंशाच्या दिव्याचाच आग्रह करणारे लोक समाजात आहेत याचच आश्चर्य वाटतं. 'मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे' असं म्हणणार्‍या बापाला मुलगा म्हणजे आयुर्विम्यासारखा वाटत असतो. तो मोठा झाल्यावर सोबत राहून आधार देईल. मरणानंतर मोक्ष देईल आणि आपला वंश पुढे चालवत ठेवील, असं वाटत असतं. वास्तविक, वंशाचा दिवा पाहिजे असं म्हणणार्‍याला वंशावळ तर माहिती असते का? आपल्या पणजोबाच्या अगोदरच्या कुणाचेच नाव सांगता येणार नाही, तरीही वंशाच्या दिव्यासाठी हट्टाहास केला जातो. बर समजा वंशाला दिवा मिळालाच नाही तर काय होईल ओ? असा काय फरक पडेल वंश नाही वाढला तर?

          गरोदरपणात सोनोग्राफी या तंत्रज्ञानाद्वारे गर्भजल प्रमाण, गर्भाची योग्य वाढ, गर्भाला जन्मत: असणारे व्यंग किंवा व्याधी कळु शकतात. या सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा शोध लावल्यावर मानवजातीची मान उंचावली खरी पण तीच मान केवळ तो गर्भ एका स्त्रीचा आहे असं समजू शकल्यामुळे आणि शस्त्राचा वापर करून निर्घुणपणे नष्ट केल्यामुळे शरमेने किती झुकली आहे, याची कल्पनाही करता येत नाही. कोणतही तंत्रज्ञान हे आपल्या सोयी साठी असतं, सुरक्षितते साठी असतं पण सध्या मानवजातीला काळीमा लागेल अशी स्त्री भ्रूणहत्या या तंत्रज्ञानाद्वारे होताना दिसत आहेत. 'स्त्री भ्रूणहत्या' हा विचार करणारा कोणी "एक" नाही. हा इतका निष्ठुर विचार कोणा एका व्यक्तीकडून मार्गी लागत नसतो. "मुलगी नकोच" असा अविचार करणारा पिता, गर्भलिंग निदान करून घेणारी माता, गर्भलिंग निदान करून, स्त्री-भ्रूणहत्या सारखं अमानवी कृत्य करणारा डॉक्‍टर, हे कृत्य न होऊ देण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणा, अशा प्रकारात रंगेहात सापडुन अडकलेल्यांना सुखरूप सोडविणारे राजकीय वरदहस्त, भावना शून्य समाज आणि हे सगळं निमूटपणे उघड्या डोळ्यांनी पाहून, वर्तमानपत्रातून वाचून आणि टीव्हीवर पाहून सुद्धा कमालीचे थंड राहून नसत्या फालतू गोष्टीचा अभिमान बाळगणारे आपण सर्व हे सगळे सामाजिक घटक स्त्री भ्रूणहत्येला कारणीभूत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.

          स्त्रीच्या गरोदरपणात तिच्या पोटी जन्म घेणारं स्त्री भ्रूण हे जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, समाजाप्रती कर्तव्यदक्ष असणा-या (माझ्या गावाकडंच्या) रोहिणी भाजीभाकरे यांच्या सारख्या अधिकारी किंवा एक आदर्श स्त्री आहे हे जर कळू शकल असतं तर स्त्री भ्रूणहत्या नक्कीच थांबली असती. हा एक काल्पनिक भाग झाला पण खरच प्रत्येक स्त्री ही याच रुपात जन्म घेते पण समाजाची क्रुर मानसिकता तिला वेगळ्या रुपात जगायला भाग पाडते. समाजातली स्त्री विषयीची ही मानसिकता जर अशीच राहिली आणि एक दिवस या छळाला कंटाळुन स्त्री ने जर प्रजनन कार्याला कायमची सुट्टी दिली तर काय होईल? ना पुरुष जन्माला येईल ना स्त्री. मग कसं चालेल हे जग? नुसती कल्पना तरी करा की काय होईल? भयानक आहे ना ही कल्पना. मग ज्या स्त्री शिवाय हे जग चालवण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही त्याच स्त्रीला गर्भातच संपवण्याचा अमानवी विचार समाजात का होतोय? हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, टिळक, आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर अशा अनेक समाजसुधारक नेत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजात थोडीफार सुधारणा जरी झाली असली तरी आजदेखील सर्व काही ठीक आहे असं म्हणण्याचं खरच धाडस होत नाही.

          गर्भातल्या मुलींची काल्पनिक पत्रं खुप आहेत. आणि खुप भावनिक ही आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या पत्रातील मजकुर सांगतो, 'आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा आणि माझी मोठी ताई जेव्हा रडायचे, तेव्हा तू त्यांना समजवायचीस, कि रडू नका, आता थोड्याच दिवसात तुमच्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, "आई भाऊ नाही अगं ताईची आणि राजाभाईची छोटी बहिण येणार आहे" असचं सांग अगं त्यांना'. खुप साधाच पण माझ्या मनात उतरलेला संवाद. हा संवाद खुप काही सांगुन जातो. ते गर्भातलं बाळ ही खुप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण ते आजच्या समाजातल्या क्रूर बुद्धिपर्यंत पोहोचत का नाही याची मनाला खुप खंत वाटते. स्त्री भ्रूण हत्या या विषयावर बरेच भावनिक लेख, बऱ्याच हृदयस्पर्शी कविता आणि पत्रे, संभाषणे आहेत. खुप समाजसेवी लोकं स्त्री भ्रूण हत्या विरोधी प्रभावी काम करत आहेत ही समाजासाठी खुप चांगली गोष्ट आहे पण मला एकच म्हणायचं आहे की "फक्त स्त्री भ्रूण हत्या थांबवुन उपयोग नाही, समाजमनाला लागलेली ही किड संपली पाहिजे, प्रत्येक आई बापाला मुला इतका मुलीचा लळा लागला पाहिजे. 'मुलगी म्हणजे संकट' ही चुकीची भावना नष्ट झाली पाहिजे. मुलगी म्हणजे ओझं न वाटता ओज (तेज) वाटलं पाहिजे."

          या सुंदर सृष्टीतलं हे सुंदर आयुष्य जगण्याचा प्रत्येक जीवाला अधिकार आहे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जावून काहीही केलं तर ते विनाशाच्याच दिशेने जात हे विसरून चालणार नाही. स्त्री भ्रूण हत्ये विषयी खुप जण बोलतात (माझ्यासारखे) पण आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली आहे. जेवताना ताटात "जिलेबी" (स्वीट डिश) असली की जेवण पूर्ण झालं असं आपण म्हणतो. मग जी मुलगी झाल्यावर आपण "जिलेबी" वाटतो तिच्या शिवाय हे जग कसं पूर्ण होईल.

या महिला दिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या ताटात "जिलेबी" (स्वीट डिश) आनंदाने, आग्रहाने आणि आवडीने घ्यावी.

सर्व महिलांना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts