"जनसामान्यांचा बिग बॉस......"

          आज काल रिऍलिटी टीव्ही शोच वारं खूपच पसरत चाललं आहे. टीव्ही हे खूप प्रभावी प्रसारमाध्यम आहे त्यामुळे त्यावर दाखविण्यात येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा प्रभाव जनसामान्यांच्या मनावर पडत असतो. मला कोणावर टीका करायची नाहीये पण "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमातून आपण समाजापर्यंत कसला संदेश देत आहोत हेच समजत नाहीये. उच्चभ्रू समजले जाणारे सेलिब्रेटी एकत्र एका घरात राहतात, भांडण करतात, प्रेम करतात, गेम खेळतात मग या गोष्टींशी जनसामान्यांचा संबंध काय......? त्यातून कोणता चांगला प्रभावी संदेश आपण समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत......? या बाबतीत माझं मत कदाचित चुकतही असेल पण मला वाटतं की "बिग बॉस" या टीव्ही शो ने एक "जनसामान्यांचा बिग बॉस" हा रिऍलिटी शो सुरू करावा. त्यात रोज खस्ता खात स्वतःच कुटुंब चालवणारा गरीब नोकरदार, निसर्गाशी लढत स्वतःचा उदरनिर्वाह करणारा गरीब शेतकरी, गरिबीतून उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकणारा तरुण, रस्त्यावर छोटंसं दुकान मांडून व्यवसाय करणारा गरीब उद्योजक, ए सी ऑफिस मध्ये बसून व्यवसाय करणारे उच्चभ्रू व्यवसायिक, तळहाताच्या फोडाप्रमाणे जनतेची काळजी घेणारे आणि सेवा करणारे (?) लोकनियुक्त प्रतिनिधी, समाजाप्रती बांधिलकी जोपासून समाजसेवेचं व्रत बाळगणारे समाजसेवक, या जनसामान्यांचाच घटक असणारे पण स्वतःच्या कर्तृत्वाने पोस्ट मिळविलेले प्रशासकीय अधिकारी, याच समाजाच्या आरोग्यव्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारे डॉक्टर, इंजिनियर, लोकनियुक्त आमदार, खासदार, या सर्वांना न्याय मिळवून देणारे न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सर्वांचाच या "जनसामान्यांचा बिग बॉस" मध्ये समावेश असावा. या सर्वांना दहाच दिवस एकत्र एका घरात ठेवावं. एकमेकांच्या समस्या, वेदना, सल या दहा दिवसांत ते समजून घेऊ शकतील. भर उन्हात, घामाच्या धारेत कष्ट करत जगणं आणि ए सी ची हवा खात मानसिक तणावात जगणं काय असतं हे एकमेकांना कळू शकेल. एकत्र राहून मैत्री करतील, एकमेकांची दुःख वाटून घेतील, वादविवाद करून तोडगा काढतील. त्यामुळे समाजापर्यंत किमान खरी परिस्थिती तरी पोहोचेल. 'हम सब एक है' चा नारा देऊन या एकत्र...... होऊ द्या असाही एक "जनसामान्यांचा बिग बॉस......"

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts