आयुष्य

रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य,
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

प्रत्येक क्षणाला नवीन
काहीतरी घडत राहतं,
पण त्या प्रत्येक
गोष्टीला अंत असतो,
दुःखाच्या क्षणी
सुखाची आस असते,
म्हणून तर आयुष्यात
वसंत असतो......

कधी कधी कडक
उन्हासारखी चिंता,
जळत राहते
दुखत राहते मनात,
कधी कधी सुखाच्या क्षणी
आनंद मिळतो,
तेव्हा घामाचाही
सुगंध येतो तळपत्या उन्हात......

आयुष्यात कधी कधी
काही गोष्टी नाईलाजाने
कराव्याच लागतात
मन मारून,
पण परिस्थिती बदलू
शकतात तेच लोक,
जे हिम्मत ठेवतात
उर भरून......

लपवता येतात बऱ्याच गोष्टी असा
पडदा म्हणजे आयुष्य,
रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य,
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

या सुंदर निसर्गाच्या
लय बद्ध हालचालीत
रमतात बागडतात
दिशा दाही,
प्रेम जिव्हाळा नसलेल्या
नुसत्या दगड विटांच्या
घरात कोणाचंच
मन रमत नाही......

पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती
नश्वर च आहे,
पोटभरून खाल्लं तरी
मन भागत नाही,
कितीही जमीन जुमला
कमवून ठेवला तरी
शेवटी सरणाला
एवढी जागा लागत नाही......

माझं आयुष्य
मला असंच हवंय
मला तसंच हवंय,
आयुष्य म्हणजे
अशा अपेक्षांचा
असतो आडोसा,
आयुष्य म्हणजे
अंधाऱ्या कोठडीत
एक कवडसा......

जगण्यातल्या चढ उतारांचा
सुंदर आलेख म्हणजे आयुष्य
रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts