मनस्वी यशोगाथा




          उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,
          क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ:
          तत् कवयो वदन्ति ॥अध्याय १४॥कथा उपनिषद॥

    "Arise, awake, and stop not till the goal is reached."

          स्वामी विवेकानंदांनी नेहमीच त्यांच्या शिकवणीत उपयोगात आणलेला कथा उपनिषदातील हा श्लोक म्हणजे माणसाच्या मनाला प्रेरणादायी ठरणारा, दिशा देणारा विचार आहे. या परिवर्तनवादी विचाराला आजच्या स्पर्धात्मक युगात समजून घेण्याची गरज आहे. नुसतं डोळे झाकून यशाच्या मागे लागण्यापेक्षा यश काय आहे, ते कसं मिळवता येईल याचा पुरेपुर विचार करून त्याचा सतत पाठपुरावा केला तर यश नक्की मिळतेच. यश हे नेहमीच कष्ट,कौशल्य व प्रयत्नांना चिकटलेले असते. त्यासाठी स्वत:वर विश्‍वासही असायला हवा. कष्ट, कौशल्य, प्रयत्न आणि आत्मविश्‍वास ही अजिंक्य सैन्य आहेत. ध्येयाने झपाटलेली माणसे या अजिंक्य सैन्याचा योग्य वापर करून यशाचा पाठपुरावा करत असतात. ध्येयवादी माणसे अपयशाला खचून गुडघ्यात मान घालून कधीच जगत नसतात, तर उद्याचा दिवस माझा आहे, या विश्वासावर ते यशा चा पाठलाग करतात, पराभवावर मात करतात आणि यशस्वी होतात.

         यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. आणि कौशल्य आणि प्रयत्न यांची जोड आहे. "बिल गेट्स" च्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले. "कर्नल सँडल्स" हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडल्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300 व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात आज सँडल्सने KFC हॉटेल्स च्या 86 देशांत 13,000 शाखा तयार केल्या आहेत. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे. "सुनीता पंडेर" नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. "जेसिका कॉक्स" नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते. स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. मग आपण का नाही होऊ शकत हा आत्मविश्वास च तुमचे आयुष्य बदलू शकतो.

          यश मिळवायच्या शर्यतीत आज काल आपण तुलनेच्या मायाजाळात खुप अडकून पडलोय. स्वत:ची इतरांशी तुलना करतोय. त्यापेक्षा "पूर्वीचा स्वत: आणि आजचा स्वत:" यात तुलना केली तर आपली प्रगती, आत्मविश्वास, गुण, दोष किती वाढलेत हे लक्षात येईल. एखाद्यातले चांगले गुण शोधून ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेरणेचे आणि कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवू शकतात. नेहमी प्रेरणादायी बोललं पाहिजे. प्रत्येक संधीचा पुरेपुर उपयोग केला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोहोचतो अन्‌ एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोहोचतो. अशाच रीतीने एखादेवेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. संधी गेली की आपण असे म्हणून स्वताचे समाधान करुन घेतो की थोडक्यात गेली, आजारी होतो, समस्या होती. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्‍वास निर्माण होतो. आत्मविश्‍वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्‍वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा. आणि अशा समस्येतुन आणि अपयशातुन मार्ग काढतच श्रेष्ठ विजेते तयार होतात.

          यशस्वी लोक हे काही अवाढव्य अचाट गोष्टी करीत नाहीत, तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्टपूर्ण आणि सकारात्मक दृष्टीने व्यवस्थित करतात. ते कसे हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगतो. एकदा एक बूट विक्री करणारी कंपनी विक्रेता म्हणून एका तरुणाला कामासाठी घेते. कंपनी त्या तरुण विक्रेत्याला बूट विकण्यासाठी आफ्रिकेतील एका बेटावर पाठवते. हा तरुण बूट विक्रेता त्या भागात जातो व पहिल्या दिवशी रिसर्च करायचा म्हणून तो त्या बेटातील एका भागाला फेरी मारून येतो. पण पहिल्याच दिवशी तो निराश होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा असेच तो त्या बेटावरील आणखी एका भागात रिसर्च करायचा म्हणून आणखी एक फेरी मारून येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो अधिक निराश होतो. तिसऱ्या दिवशी पुन्हा असेच घडते व तो पूर्णपणे निराश होऊन कंपनीला फोन करतो व सांगतो की इथे बूट विकणे शक्य नाही. सर्व माल परत घेऊन जा कारण इथे कोणीच बूट घालत नाही. कंपनीला हे उत्तर मिळता क्षणी ते त्याला कामावरून तात्काळ काढून टाकतात व दुसऱ्या एका तरुण विक्रेत्याला त्याच बेटावर बूट विक्री करण्यासाठी पाठवतात. हा नवीन तरुण विक्रेता पहिल्या दिवशी रिसर्च करायचा म्हणून तो त्या बेटातील एका भागाला फेरी मारून येतो. तो पहिल्याच दिवशी खूप आनंदी व खुश होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा असेच तो त्या बेटावरील आणखी एक भागात रिसर्च करायचा म्हणून आणखी एक फेरी मारून येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो अधिक आनंदी व खुश होतो. तिसऱ्या दिवशी पुन्हा असेच घडते व तो पूर्णपणे आनंदी, उत्साही व खुश होऊन कंपनीला फोन करतो व सांगतो की इथे सर्वांना बूट विकणे शक्य आहे. आपल्याकडे आहे तितका सर्व माल इथे पाठवून द्या, कारण इथे कोणीच बूट घालत नाही. परिस्थिती तीच, बेट तेच, त्या बेटा वरची बूट न घालणारी माणसे ही तीच… मग त्या दोन तरुण विक्रेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया का आल्या? एकाला वाटले काहीच शक्य नाही, कोणी बूट घेणार नाही. दुसऱ्याला वाटले सर्व शक्य आहे, सर्वजण बूट विकत घेऊ शकतात. एकाची होती नकारात्मक प्रवृत्ती व दुसऱ्याची होती सकारात्मक प्रवृत्ती. आपली ही सकारात्मक प्रवृत्तीच आपले यश ठरवत असते.त्यामुळे नेहमी कोणत्याही गोष्टीत सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

          "लोग क्या कहते है, ओ मत सुनो, अपने दिल की सुनो, दिल की" हा 3 idiots सिनेमा मधला dialouge खोलवर विचार करायला लावणारा आहे. आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे आवड आहे तीच गोष्ट आपण मनापासून करतो ते करण्यात एक वेगळा आनंद असतो. आणि तेच ध्येय आपलं असलं पाहिजे तरच प्रामाणिकपणे आपण काम करून यश मिळवु शकतो. एक निश्चित ध्येय ठरवून ते ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावले तर ते तुम्हाला रोज तुमच्या ध्येयाची आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआप त्याच दिशेने वाटचाल करेल. फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं घालवतात. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्‍चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्‍चित हवं, स्पष्ट हवं, ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं, आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला ते आवडणार हवं.

In order to succeed, you must first believe that you can.
In order to succeed, your desire for success should be greater than your fear of failure.
In order to succeed, you must need to find something to hold on to, something to motivate you, something to inspire you.

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts