बळीराजा
जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आता उपाशीपोटी राहण्याची वेळ आलीय. पण मला माझ्या शेतकरी मित्राला एवढच सांगायच आहे की परिस्थितीशी झगडण्यात धैर्य आहे. हे धैर्य तुम्ही दाखवण्याची हीच वेळ आहे. भ्याडासारखं मरणाला कवटाळू नका. ही वेळ नक्की निघून जाईल. स्वत:ला आणि कुटुंबाला धीर द्या.
आत्महत्या हा उपाय नाही रे
हे बळीराजा !!!!!!
दिवसा उन्हातान्हाचं घाम गाळुन
रात्रीही पिकांची चिंता तुला राही रे
जगाचा पोशिंदा म्हणतात तुला
तुझ्या धान्याची सर्वच जग वाट पाही रे
तुझ्यावर आलेल्या या संकटांना
आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे
हे ही वाईट दिवस निघून जातील
असं नेहमीच सांगते तुझी आई रे
तुझं धैर्य आहेत तुझी लेकरं बाळं
तू आज येशील अशीच वाट पाही रे
तुझ्या संसाराची तुलाच काळजी
मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे
आठव तुझ्या खंबीर बापाची हिम्मत
तुझ्यासाठी केली शरीराची लाही लाही रे
आठव तुझ्या बायकोचं आतोनात कष्ट
ती तुझ्यासाठीच कायम झुरत राही रे
तुझ्या भावनांना आम्ही समजू शकतो
पण आत्महत्या हा एकच उपाय नाही रे
आत्महत्या हा एकच उपाय नाही रे
या सुजलाम सुफलाम देशाचा राजा तू
अशा विध्वंसक निर्णयाची नकोस करू घाई रे
या जगाच्या कणाकणात हक्क तुझाच
तुझ्या जाण्याने रडल्या दिशा दाही रे
धीर दे स्वताला, तुझ्या कुटुंबाला
खरचं मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे
- डॉ संदीप टोंगळे
टिप- माझ्या कोणत्याही शेतकरी मित्राला माझी कसलीही मदत लागली तर 9561646178 या क्रमांकावर संपर्क करा. मी आणि आपला सर्व समाज तुमच्या मदतीस बांधील आहोत.
Comments
Post a Comment