"माझी कागदी होडी"


"ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छिन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपनका सावन
वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी"

          कितीही पैसा खर्च केला तरी आपलं बालपण आपण परत नाही आणु शकत. आणि त्याची ओढ ही मोठं झाल्यावरच कळते. ते पावसात मनसोक्त ओलं चिंब भिजणं, पाण्याच्या डबक्यात मुद्दाम उडी मारणं, चिखलात खेलणं, पावसात घरातली भांडी भरुन घेणं, पाऊस संपला आणि चिखल झाला की तो खुपसणी चा खेळ, पावसात, चिखलात क्रिकेट, फुटबॉल या सर्व गोष्टी खेड्यात राहणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या असतातच. क्रिकेट एक टप्पाआऊट, सुरपारंब्या, सुरपाट्या, लगोरी, डबा ऐसपैस, भोवरा, गोट्या, विटी-दांडु, लंगडी, पकडा पकडी, शिवणापाणी, चोर शिपाई, माझ्या आईचे किंवा मामाचे पत्र हरवले, भेंड्या, पतंग, आंधळी कोशिंबीर, पत्ते-मुंगूस, ५-३-२, झब्बू, गोट्या, कोय-या, मेणबत्तीच्या उजेडांत हाताने आकृती काढणे, सारीपाट, आट्यापाट्या, सापशिडी, नवा व्यापार, संगीत खुर्ची, छापा काटा असं किती किती प्रकारे त्या बालपणीचा आनंद घेतला असेल आपण सर्वांनीच. खरचं "रम्य ते बालपण आणि दिव्य त्या आठवणी". ते बालपण परत नाही येऊ शकत पण त्या आठवणींची जी भलीमोठी प्रॉपर्टी आहे आपल्या सर्वांकड़े ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि कधीतरी बाहेर काढून त्यात मनमुराद रमलं पाहिजे. अधून मधून का होईना पण मोठेपणी हे बालपण अनुभवलं तरच आयुष्यात मज्जा आहे. या आठवणींची पेटी कधी कधी उघडून बघितली तर लहानपण अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. याच आठवणीतली एक आठवण म्हणजे "माझी कागदी होडी". या दुनियादारीच्या प्रपंचात कुठे तरी हरवली आहे? तीच शोधण्याचा प्रयत्न करतोय या लेखामधुन......

          मला "माझी कागदी होडी" शोधण्याच्या लागलेल्या हुक्कीचं कारण म्हणजे लहान मुलांच्या शाळेतील वार्षिक स्नेह संम्मेलन. हो मागे एकदा माझ्या मुलीच्या शाळेत वार्षिक स्नेह संम्मेलनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या सर्व चिमुकल्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम सादर केला की एकक्षण मी हरवूनच गेलो. त्या कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्या, पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, वृक्ष तोड अशा अनेक विषयावर खुप सुंदर प्रकाश टाकला गेला. ती लहान चिमुकली मूलं ज्वलंत सामाजिक प्रश्न इतक्या सुंदर रित्या मांडत होती की असं वाटलं की या लहान मुलांना सामाजिक जाण आहे पण आपल्याला का नाही? हीच लहान मूलं देशाचं भवितव्य आहेत याचा अभिमान वाटतोय. या लहान मुलांच्या सामाजिक जाणीवेच्या पाठीमागे त्यांचे पालक, शिक्षक किंवा आपण सर्व जणच आहोत पण हीच सामाजिक जाणीव आपण जोपासतो का? आज लहान मुलांना जे आपण शिकवतो त्याची स्वतः किती प्रमाणात अंमलबजावणी करतो? त्या लहान मुलांकडे कागदाची होडी आहे तीच त्यांची आणि त्यांच्या विचारांची श्रीमंती. पण आपली कागदाची होडी कुठे हरवली आहे तीच आपल्या विचारांची श्रीमंती (सामाजिक जाणीव) आपण गमावून बसलोय का? या मुलांसारखं आपणही बालपणात खुप चांगल्या गोष्टी शिकलोय मग त्या आता कुठे हरवल्या? सामाजिक जाणीव फक्त लहान वयापुरतीच मर्यादित आहे का? मोठेपणी काय होत या सामाजिक जाणीवेच? लहानपणात हरवलेली ही "कागदी होडी" नंतर कोणीही शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या प्रापंचिक भावविश्वात एवढा रमलेला आहे की आपलं काहीतरी हरवलं आहे याचं सुद्धा भान नाही राहील.

          खरचं मित्रहो, आपल्याला आपले सामाजिक भान पुन्हा चाचपण्याची वेळ आली आहे. कितीतरी वेळा आपण निव्वळ system वर टिका करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. उदाः सार्वजनिक स्वच्छता. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी बाटली चा सर्रास वापर होतोय. पण पाणी पिऊन झालं की ती मोकळी पाण्याची बाटली आपण कुठेही फेकुन देतो, ती गटारीत पड़ते आणि पावसाळ्यात गटारी बंद पडल्या की नालेसफाई च्या नावाने प्रशासनावर टिका करतो. त्यापेक्षा ती पाण्याची बाटली crush करुन व्यवस्थीत कचरापेटीत टाकली तर प्रश्नच नाही का मिटणार......? अशीच छोटी छोटी किती तरी उदाहरण आहेत की ज्यात आपण आपली सामाजिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. लहान वयात जे शिकतो, शिकवतो ते मोठे पणी विसरून जातो. या अशा सांस्कृतिक कार्यक्रमातुन लहान मुलांना दिलेला सामाजिक जाणीवेचा "बाळकडू" खरचं कौतुकास्पद आहे पण तो मोठेपणी जिभेला (मनाला) अधिकच कडू का लागतो? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

देणा-याने देत जावे; घेणा-याने घेत जावे !
घेता घेता एक दिवस; देणा-याचे हात घ्यावे !

          समाजाला निस्वार्थी भावनेने, सढळ हाताने मदत करणारीही खुप मंडळी आहेत की जी लोकं 'ज्या समाजाने आपल्याला भरपूर दिलयं त्या समाजाच आपणही खुप काही देणं लागतो' ही जाणीव ठेवून समाज बांधिलकी जपतात. पण देणा-यांच्या हातांपेक्षा घेणा-यांच्या हातांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे मग ही आर्थिक विषमतेची दरी कशी पार होणार? म्हणूनच आपण सर्वांनीच आपली हरवलेली "कागदी होडी" शोधली पाहिजे, सामाजिक जाणीव ठेवून वागायला पाहिजे. मला वाटत जसं आपण या लहान मुलांना हे सामाजिक जाणीवेच बाळकडू देतोय तसचं आता आमच्या सारख्या तरुण पिढीलाही या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून द्यायची गरज आहे. या तरुणाई च्या नसानसात जर समाजाबद्दलची जाण भिणली तर दिव्य समाज निर्मितीला वेळ लागणार नाही. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या पेटीतली हरवलेली "माझी कागदी होडी" मला सापडली आहे, आणि मी ती आयुष्यभर जपेलच आणि सर्वांना ती शोधून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts